नव्या जातींची वैशिष्ट्ये काय?
मुख्यत: पाऊस कमी झाल्याच्या किंवा पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या या दोन जाती आहेत. या दोन जातींची महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल आदी चौदा राज्यांकरिता शिफारस करण्यात आली आहे. प्रामुख्याने कमी पावसाच्या काळात दुष्काळ, पाणीटंचाईच्या काळात भाताच्या उत्पादनात मोठी घट होत होती. या दोन जातींच्या लागवडीतून कमी पावसाच्या काळातही सरासरी इतके किंवा सरासरीपेक्षा जास्त भात उत्पादन होण्याची शक्यता आहे.
भाताच्या या जाती कशा विकसित झाल्या?
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे हवामानाच्या टोकाच्या घटना घडत आहेत. अति पाऊस, अति तापमान, अति थंडी आणि दुष्काळाच्या घटना वाढल्या आहेत. हवामानाचा हा ताण सहन करणाऱ्या जातींचे जगभरात संशोधन होत आहे. देशातही भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) याबाबत संशोधन करीत आहे. देशात मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या सांबा महसुरी (बीपीटी ५२०४) आणि एमटीयू १०१० (कोट्टोंडोरा सन्नालू) या दोन ताणसहनशील, उत्पादन आणि हवामान अनुकूल आणि मूळ क्षमता टिकवून ठेवणाऱ्या अशा वाणांपासून शास्त्रज्ञांनी ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जाती विकसित केल्या. दोन्ही जातींमध्ये कमी पाण्यातही नत्राचा वापर करून घेण्याची उच्च क्षमता आहे. डीआरआर धान १०० (कमला) हे वाण आपल्या मूळ जातीच्या तुलनेत २० दिवस आधी (१३० दिवसांत) पक्व होऊन लवकर काढणीला येते.
तांदूळ उत्पादन देशासाठी किती महत्त्वाचे?
देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी किंवा सुमारे १४० कोटी लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी केंद्र सरकार डाळी, कडधान्ये, तेलबिया, खाद्यातेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजना आखत आहे. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात भात रोज आणि सर्रास वापरले जाणारे धान्य आहे. देशाचे एकूण भात उत्पादन १३०० लाख टनांवर गेले आहे. २०२२-२३ मध्ये १७७ लाख टन, २०२३-२४ मध्ये १७५ लाख टन तांदूळ निर्यात झाली होती. सध्या आपण दरवर्षी ४८ हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात करतो. बिगर बासमती तांदळाची बाजारपेठही विस्तारत आहे. त्यामुळे देशाच्या तांदूळ उत्पादनात वाढ करणे, निर्यात वृद्धीतून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त आर्थिक फायदा मिळवून देण्याला सरकार आणि संशोधकांचे प्राधान्य आहे. आता पाणी, तापमान, थंडीचा ताण सहन करणाऱ्या जातींचा शोध लागल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळेल.
पण प्रत्यक्षात लागवड होईल?
जगभरात हवामान बदल अनुकूल फळे, अन्नधान्य, पालेभाज्यांच्या वाणांचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. देशातही नवीन भाताच्या जाती विकसित करण्यात आल्या. प्रत्येक जातीचे उत्पादन, लवचीकता आणि गुणवत्तेचे वेगवेगळे फायदे आहेत. त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. जनुकीय संपादित तांदळाच्या जाती यापूर्वी चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत. परंतु त्यापैकी अनेक जाती संशोधनापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. या जातींची व्यावसायिक पद्धतीने लागवड न झाल्यास या वाणांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे देशात संशोधित झालेल्या जातींची प्रचार – प्रसिद्धी करण्याची गरज आहे. हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिफारस केलेल्या सर्व राज्यांत यंदा प्रायोगिक लागवड होण्याची गरज आहे. प्रायोगिक लागवडीतून उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आल्यास आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास या वाणांची व्यावसायिक लागवड होईल, अन्यथा ही नवी वाणेही संशोधनापुरतीच मर्यादित राहतील.