पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध भारताकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सैन्यदलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यांनी या ऑपरेशनमध्ये आलेल्या आतापर्यंतच्या यशाविषयीदेखील सांगितले. एअर मार्शल ए. के. भारती यांनी माहिती दिली की, ऑपरेशनमध्ये सहभागी असणारे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील लक्ष्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यांद्वारे आपली सर्व उद्दिष्टे साध्य केली. ते म्हणाले, “पाकिस्तानविरोधातील ही कारवाई पाकिस्तानी सैन्य किंवा नागरिकांवर नव्हती, तर दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी होती.”

ऑपरेशनची माहिती देताना सशस्त्र दलांनी एक व्हिडीओदेखील दाखविला. या व्हिडीओत पाकिस्तानमधील दारूगोळा भांडारांना झालेले नुकसान स्पष्ट दिसून आले. रविवारीदेखील आयएएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळीही अशाच स्वरूपाचा एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता. त्यामध्ये भारतीय हल्ल्यांचा परिणाम दिसून आला होता. एअर मार्शल ए. के. भारती नक्की कोण आहेत? त्यांनी हवाई हल्ल्याची माहिती देताना नक्की काय सांगितले? त्याविषयी जाणून घेऊ.

पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध भारताकडून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

एअर मार्शल ए. के. भारती कोण आहेत?

एअर मार्शल ए. के. भारती हे भारतीय हवाई दलात ऑपरेशन्सचे महासंचालक आहेत. महासंचालक हे सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी असतात. ते देशांतर्गत आणि सीमेवरील ऑपरेशन्स हाताळण्यासाठी जबाबदार असतात. सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी धोरणात्मक आणि ऑपरेशनल पातळीवर काम करून, त्या कामाचा अहवाल थेट त्यांच्या संबंधित सेवेच्या प्रमुखांना देतात. एअर मार्शल भारती यांना १९८७ मध्ये लढाऊ क्षेत्रात कमिशन देण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी, संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. ए. के. भारती यांनी फ्लाइट कमांडर आणि नंतर सुखोई-३० एमकेआय स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर म्हणूनदेखील काम केले. त्यांनी पुण्यातील लोहगाव येथे दोन विंगचे नेतृत्वदेखील केले. तसेच त्यांनी पूर्व आणि मध्य हवाई कमांडमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

‘गगनशक्ती’सारख्या महत्त्वाच्या आयएएफ सरावांमध्येदेखील ए. के. भारती सहभागी झाले आहेत. त्यांनी २००६ मध्ये रॉयल एअर फोर्सबरोबर इंद्रधनुष आणि २००७ मध्ये फ्रेंच एअर फोर्सबरोबर गरूड अशा आंतरराष्ट्रीय हवाई सरावांमध्ये संघांचे नेतृत्व केले. त्यांनी बजावलेल्या सेवेमुळे त्यांना १९९७ मध्ये वायुसेना पदक, हवाई दलप्रमुखाला दिला जाणारा प्रशंसा पुरस्कार आणि अपघातमुक्त उड्डाणासाठी क्वचित मिळणारा ‘थ्री स्टार्स’ हा सन्मानदेखील मिळाला आहे.

एअर मार्शल यांनी हल्ल्याची माहिती देताना ‘रामचरितमानस’ का म्हटले?

सोमवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीत एअर मार्शल ए. के. भारती यांनी सीमेपलीकडे संदेश देण्यासाठी हिंदी कवी रामधारी सिंह दिनकर यांचा एक श्लोक म्हटला. सशस्त्र दलांनी अलीकडेच केलेल्या व्हिडीओ सादरीकरणात दिनकर यांच्या कवितेचा वापर केल्याबद्दल पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता, एअर मार्शल भारती यांनी ‘रामचरितमानस’मधील “विनय ना मानत जलध जड गये तीन दिन बीती। बोले राम सकोप तब, भय बिनु होये ना प्रीती,” अशी एक ओळ उद्धृत केली. एअर मार्शल भारती पुढे म्हणाले, “शहाण्यांसाठी एक इशारा पुरेसा आहे. या ओळीतील भय बिनु होये ना प्रीतीचा अर्थ असा होतो की, मनात भीती वाटल्याशिवाय प्रेम, सन्मान मिळू शकत नाही. ही ओळ कदाचित पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताच्या आक्रमक प्रतिसादाचा संदर्भ देते.”

ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत काय सांगितले?

सोमवारी एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले की, सर्व भारतीय लष्करी तळ पूर्णपणे आणि सामान्य स्वरूपात कार्यरत आहेत. भारती यांनी भारतीय तळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “गरज पडल्यास भविष्यातील कोणत्याही मोहिमेसाठी तळ तयार आहेत. त्यांनी लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्याचे श्रेय भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीला दिले.” ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी असलेले सर्व वैमानिक सुरक्षित परत आल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ते म्हणाले, “या ऑपरेशनमधून आम्ही आमचे सर्व उद्दिष्ट साध्य केले आहे आणि आमचे सर्व वैमानिक घरी परतले आहेत.”

त्यांनी अशीही माहिती दिली की, काही पाकिस्तानी विमाने पाडण्यात आली होती. परंतु, त्यांनी या विमानांची संख्या स्पष्ट केली नाही. ते म्हणाले, “पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यामुळे आमच्याकडे या विमानाचे कोणतेही अवशेष नाहीत. परंतु, आम्हाला खात्री आहे की, ते ठार झाले आहेत.” एअर मार्शल भारती म्हणाले, “आम्ही काळजीपूर्वक लक्ष्यांची निवड केली आणि निवडलेल्या नऊ लक्ष्यांपैकी भारतीय हवाई दलाने लक्ष्य केलेले बहावलपूर व मुरीदके येथे मोठी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे होती.” ते म्हणाले की, पाकिस्तानने घुसखोरी करण्यासाठी ड्रोन आणि इतर हवाई उपकरणे वापरली होती; परंतु आमच्या मजबूत हवाई संरक्षण प्रणालीने त्यांना परतवून लावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले की, पाकिस्तानने लष्करी सुविधा आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले असल्याने आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. “आमची प्रतिक्रिया जलद होती. आम्ही लाहोर आणि गुजरानवालाजवळील त्यांच्या रडार प्रतिष्ठानांवर हल्ला केला. आम्हाला हे दाखवायचे होते की, आम्ही तयार आहोत आणि तरीही आम्हाला तणाव वाढवायचा नाही. आमची लढाई दहशतवाद्यांशी होती, पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांशी नाही,” असे ते पुढे म्हणाले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने या तणावादरम्यान नागरी उड्डाणांना परवानगी दिली होती. ते म्हणाले, “कोणत्याही नागरी विमानाचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी आम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागली.”