मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा ते विरार असा अंदाजे ९४ किमीचा (जोडरस्त्यासह) सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एमएमआरडीएकडून जोरदार तयारी सुरू होती. लवकरच या सागरी सेतूच्या बांधकामासाठी निविदा काढण्याचेही एमएमआरडीएचे नियोजन होते. असे असताना अचानक राज्य सरकारने वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द केला आहे. आता उत्तन ते विरार असा केवळ ५५ किमीचा सागरी सेतू एमएमआरडीएकडून बांधला जाणार आहे. वर्सोवा ते विरार सागरी सेतू का रद्द करण्यात आला, उत्तन ते विरार सागरी सेतू कसा असेल, याचा आढावा…

सागरी सेतू प्रकल्पाची गरज का?

मागील काही वर्षांपासून मुंबई आणि आसपासचा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. त्या अनुषंगाने येथील वाहनांची संख्या वाढत असून परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक वा मेट्रो वाहतूक विकसित करण्यासाठी जागा लागते. मुंबईसारख्या ठिकाणी अशा वाहतूक व्यवस्था निर्माण करणे जागेच्या कमतरतेमुळे कठीण ठरत आहे. त्यातूनच सागरी सेतूची संकल्पना पुढे आली आणि अरबी समुद्रात पहिला वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधला गेला.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती

हेही वाचा – विश्लेषण : ‘थ्री इ़डियट्स फेम’ सोनम वांगचुक यांचे आंदोलन का चिघळले? लडाखवासियांचा केंद्र सरकारवर राग कशासाठी?

मुंबईतील सागरी सेतू प्रकल्प कोणते?

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि वेगवान प्रवासासाठी सागरी सेतूची संकल्पना पुढे आणली. त्यानुसार राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून नरिमन पॉईंट ते वर्सोवा असा सागरी सेतू प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र काही कारणाने नरिमन पॉईंट ते वरळी सागरी सेतू अजूनही मार्गी लागलेला नाही. पण वरळी ते वांद्रे सागरी सेतू पूर्ण झाला असून तो मागील काही वर्षांपासून वाहतूक सेवेत कार्यान्वित आहे. सध्या वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्याच वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचा वर्सोवा ते विरार असा विस्तार करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला होता. मात्र एमएसआरडीसीला आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प मार्गी लावता आला नाही. त्यामुळे वर्सोवा ते विरार सागरी सेतू राज्य सरकारने एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला होता.

वर्सोवा ते विरार प्रकल्प नेमका काय होता?

एमएसआरडीसीच्या वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचा विस्तार पुढे वर्सोवा ते विरार असा एमएमआरडीएच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यानुसार हा विस्तारीत सागरी सेतू ९४ किमीचा (जोडरस्त्यांसह) होता. या सागरी सेतूसाठी अंदाजे ६३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या सागरी सेतूमुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर होणार होती तर दक्षिण मुंबईतून थेट विरार अवघ्या काही मिनिटांत गाठता येणार होते. ४२.२७ किमीच्या (जोडरस्ते वगळता) या सागरी सेतूचा वापर अधिकाधिक प्रवाशांना करता यावा यासाठी या प्रकल्पाला चार कनेक्टर देण्यात येणार होते. चारकोप, उत्तन, वसई आणि अर्नाळा असे हे चार कनेक्टर होते. या कनेक्टरमुळे प्रवासी, वाहन चालकांना चार ठिकाणांहून सागरी सेतूवर येता-जाता येणार होते. या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये असून तो पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार अंतर केवळ ४५ मिनिटांत पार होणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.

हेही वाचा – विश्लेषण : हिरव्या युनिफॉर्मबाबतचा निर्णय झोमॅटोला काही तासांतच का बदलावा लागला?

वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द का?

वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जोरदार तयारी एमएमआरडीएकडून सुरू होती. तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार त्या सेतूचा पालघरपर्यंत विस्तार करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वर्सोवा-विरार-पालघर सागरी सेतूच्या आराखड्याचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. त्यासाठीची तयारी सुरु होती, असे असताना राज्य सरकारने वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द केला आहे. मुंबई महानगर पालिकेकडून प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत असा सागरी किनारा मार्ग बांधला जात आहे. तर पुढे एमएसआरडीसीकडून वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे बांधकाम केले जात आहे. तर पुढे वर्सोवा ते विरार सागरी सेतू एमएमआरडीए बांधणार होते. मात्र वर्सोवा ते दहिसर, भाईंदर असा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. एकाच ठिकाणी दोन प्रकल्पांचे नियोजन करण्यात आल्याने कोणत्या तरी एका प्रकल्पाची व्यवहार्यता संपुष्टात आणणे भाग झाले. त्यामुळे राज्य सरकारने वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द केला आहे.

उत्तन ते विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार होणार का?

वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द करण्यात आला असला तरी आता एमएमआरडीएकडून उत्तन ते विरार आणि पुढे विस्तारित विरार ते पालघर सागरी सेतू बांधला जाणार आहे. त्यानुसार उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यानुसार ५५ किमीच्या (जोडरस्त्यासह) उत्तन ते विरार सागरी सेतूचा आता नव्याने आराखडा तयार केला जाणार असून या प्रकल्पाची नव्याने व्यवहार्यता तपासणीही केली जाणार आहे. विरार ते पालघर सागरी सेतूचाही आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे आता नव्याने एमएमआरडीएला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागणार असून त्यासाठी काही काळ जाणार आहे. दरम्यान वर्सोवा ते विरार सागरी सेतूच्या खर्चात आता २५ टक्क्याने घट होणार आहे. हा निधी विरार ते पालघर सागरी सेतूसाठी वापरला जाणार आहे. प्रवाशांना भविष्यात दक्षिण मुंबई ते पालघर असा थेट प्रवास किनारा मार्ग आणि सागरी सेतूच्या माध्यमातून करता येणार आहे.