-चंद्रशेखर बोबडे देश-विदेशात आपल्या खास चवीमुळे ‘नागपुरी संत्री’ (Nagpur Orange) म्हणून प्रसिद्ध असलेली विदर्भातील संत्री सध्या बागांमध्ये पडलेल्या कोळशी रोगांमुळे काळवंडली आहे. (Orange yield in Vidarbha faces serious pest threat) सुमारे पावणेदोन लाख हेक्टरपैकी ४० ते ५५ टक्के बागा या बुरशीजन्य रोगामुळे प्रभावित झाल्या असून उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर बागच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. संत्री बागांवर पडणारा कोळशी रोग काय आहे? काळ्या माशीपासून निर्माण होणाऱ्या किडीपासून या रोगाचा प्रादुर्भाव होतो. माशी आकाराने साधारणत: एक ते दीड मिलिमीटर लांब असते. पंख काळसर व पोटाचा भाग लाल असतो. विदर्भातील हवामान तिच्यासाठी पोषक ठरते. माशा झाडांच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने अंडी घालतात. काळी माशी पानातील रस शोषते. त्याचवेळी माश्यांच्या शरीरातून चिकट द्रव्य स्रवते. पानाच्या मागे, फांद्या फळांचा वरच्या पृष्ठभागावर यामुळे बुरशी वाढते. तिला काळसर रंग असतो. त्यामुळे बुरशीला ‘कोळशी’ म्हणून संबोधण्यात येते. प्रादुर्भाव झाल्याचे केव्हा निदर्शनास येते? संत्री बागांमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे उत्पादकांच्या लगेच निदर्शनास येत नाही. झाडांच्या पानावरील बुरशी खरडल्यास तिला ताण जात असेल तर ती प्रादुर्भावाची प्राथमिक अवस्था समजली जाते. परंतु जर बुरशीने संपूर्ण पान व्यापले असेल किंवा हात लावल्यास बोट काळे होत असेल तर ही प्रादुर्भावाची गंभीर अवस्था मानली जाते. या बुरशीमुळे पानातील अन्नद्रव्य निर्माण करण्याची क्षमता क्षीण होत जाऊन फुले फळधारणेसाठी निष्क्रिय ठरतात. त्यामुळे नाईलाजाने संपूर्ण बागाच तोडण्याची वेळ अनेकदा शेतकऱ्यांवर येते. बागांमधील कीड व्यवस्थापन फोल ठरले का? संत्र्याचे प्रामुख्याने दोन बहर असतात. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठातील संशोधकांनी कीड व्यवस्थापनाची सूत्रे निर्धारित केली आहेत. त्यात कीटकनाशकांची फवारणी प्रमुख आहे. त्यानुसार मृग बहरासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तसेच आंबिया बहरासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व पुन्हा १५ दिवसांनंतर निंबोळी तेल १०० ते १२५ मिली अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. निंबोळी तेल पाण्यात मिश्रण करण्यासाठी १०० मिली निंबोळी तेलात १० ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रमाणात मिसळावे व या मिश्रणाची फवारणी करावी. संत्री पिकावर वेळोवेळी विशेषत: झाडांना पालवी फुटण्याच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काच्या१५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. यामुळे संभाव्य नुकसान टाळता येईल, असा कृषी संशोधकांचा दावा आहे. मात्र या उपाययोजनेंतरही कोशळीचा प्रादुर्भाव होत असल्याने हे उपाय फोल ठरल्याचेच दिसून येते. नक्की वाचा >> विश्लेषण: ठाणे जिल्ह्यात बिबट्याच्या अधिवासाची कारणे काय? विदर्भातील संत्री बागांवरील प्रादुर्भावाचे प्रमाण किती? विदर्भात १ लाख ७२ हेक्टरमध्ये संत्री, मोसंबीची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने अमरावती, वर्धा, नागपूर या तीन प्रमुख जिल्ह्यांसह विदर्भातील अकोला व इतरही जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या एकूण लागवडीच्या ४० ते ५० टक्के बागांवर कोळशीचा प्रादुर्भाव असून तो सारखा वाढत जात आहे. याचा सर्वाधिक फटका नागपूर, अमरावती या दोन प्रमुख संत्री उत्पादक जिल्ह्यांना बसल्याचे या भागातील शेतकरी सांगतात. ३० वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. याचा जबर फटका विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला होता. आता पुन्हा या रोगाने तोंड वर काढले आहे. उत्पादनावर काय परिणाम होतो? हा रोग संत्री उत्पादक पट्ट्यात पसरल्यास बागांचे प्रचंड नुकसान होते. संत्री बागेत कोळशी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फळांवर काळ्या रंगाचे डाग पडतात. डाग पडलेल्या संत्रीला बाजारपेठेत मागणी नसते. प्रादुर्भावामुळे उत्पादनही निम्म्यावर येते त्यामुळे बागा खरेदी करणारे व्यापारीही गावांमध्ये फिरकत नाही. सध्या याच अवस्थेतून विदर्भातील संत्री उत्पादक जात आहेत. रोग नियंत्रणात न आल्यास संपूर्ण बागच तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. नक्की वाचा >> विश्लेषण: नारळ काढण्यासाठी प्रशिक्षणाची गरज? कोकणातील दुर्लक्षित कल्पवृक्षाबाबत ही समस्या का उद्भवते? राष्ट्रीय संशोधन संस्थांचा शेतकऱ्यांना फायदा होतो का? नागपुरात लिंबुवर्गीय फळे संशोधन संस्था ही राष्ट्रीय पातळीवर संत्रीवर संशोधन करणारी संस्था आहे. याशिवाय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातही संत्री रोगावर नियंत्रणासाठी संशोधन केले जाते. या संस्थांमधील संशोधन संत्री उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याची ओरड शेतकरी करतात. हीच बाब अनेकदा नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे संशोधन संस्थांच्या व्यासपीठावरही मांडली. बुरशी रोगाबाबत या संस्थांकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड अद्यापही कायम आहे.