देशाच्या एकूण उत्पादनापैकी ८० टक्के कांदा राज्यात उत्पादित केला जातो. राज्यातील विविध भागात कांद्याची लागवड केली जाते. मात्र राज्यात उत्पादित होणाऱ्या कांद्याच्या तुलनेत अलिबागचा पांढरा कांदा वेगळा ठरतो. चव आणि औषधी गुणधर्म यामुळे या कांद्याला मोठी मागणी असतेच. शिवाय लाल कांद्याच्या तुलनेत अधिक दरही मिळतो.

पांढऱ्या कांद्याची लागवड कधी होते?

भातकापणीनंतर जमिनीत जो ओलावा शिल्लक असतो, या ओलाव्याचा कांदा लागवडीसाठी उपयोग होतो. साधारणपणे नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला शेतकरी नांगरणी करून या कांद्याची लागवड करतात. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर व्हावा यासाठी कडेने कोबी, वांगी, मिरची, नवलकोल यांसारख्या पिकांची लागवड केली जाते. सेंद्रिय पद्धतीचा वापर करून कांद्याचे पीक घेतले जाते.

हेही वाचा : सुरतमध्ये निवडणूक न होता खासदार संसदेत; बिनविरोध निवड कशी होते?

कांदा लागवड कशी सुरू झाली?

अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला सुरवात झाली. पूर्वी बेने इस्रायली मंडळी या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होती. ते भाजीपाला लागवड करत असत. त्यांनी पांढऱ्या कांद्याचे वाण आपल्यासोबत इस्रायलहून आणले असावे. नंतर या वाणाचा वापर करून अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली असावी असे सांगितले जाते. दरवर्षी शेतकरी जेवढ्या कांद्याची लागवड करतात, त्यातील एक भाग पुढील वर्षासाठी बियाणांसाठी राखून ठेवतात. ही परंपरा अव्याहतपणे आजही सुरू आहे.

औषधी गुणधर्म कोणते?

या कांद्यात मिथाइल सल्फाइड आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण साध्या कांद्याच्या तुलनेत जास्त आढळते. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो. अनिमिया दूर होण्यासाठी हा कांदा सहायभूत ठरत असल्याचे सांगितले जाते. कांद्यात चरबीचे प्रमाण नगण्य असते. अॅन्टी ऑक्सिडंट म्हणूनही शरीराला याची गरज असते.

हेही वाचा : मुस्लिमांना अधिक मुले असल्याचे मोदींचे वक्तव्य; आकडे काय सांगतात?

इतर पांढऱ्या कांद्यांच्या तुलनेत वेगळा?

देशाला लागणाऱ्या एकूण कांद्यापैकी ८० टक्के कांद्याचे उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. यात प्रामुख्याने लाल कांद्याचा समावेश असतो. पण पुणे, पालघर, वसई येथे पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. तेथील पांढऱ्या कांद्याच्या तुलनेत अलिबागचा पांढरा कांदा हा उजवा ठरतो. चव, औषधी गुणधर्म यामुळे तो ग्राहकांच्या विशेष पसंतीस पडतो. कांद्याची साठवणूक सुलभ व्हावी, तो हवेशीर राहावा यासाठी पातीसह कांद्याच्या विशिष्ट पद्धतीने माळा बांधल्या जातात.

बाजारपेठेचा विस्तार कसा झाला?

पूर्वी अलिबाग तालुक्यातील जेमतेम १०० हेक्टर परिसरात या कांद्याची लागवड केली जात होती. मात्र रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे कांद्याची मागणी सातत्याने वाढत गेली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने कांद्याला चांगला दर मिळू लागला. त्यामुळे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत गेला. आज जवळपास २६५ हेक्टरवर या कांद्याची लागवड केली जाते, ज्यातून दरवर्षी ३ लाख मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होते. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने २०२२ मध्ये अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन बहाल केले. त्यामुळे कांद्याची मागणी अधिकच वाढली. कांद्याचे ब्रँडिंग होण्यास यामुळे मदत झाली.

हेही वाचा : आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?

लाल कांद्याच्या तुलनेत दर जास्त कसे?

राज्यात उत्पादित होणाऱ्या लाल कांद्याच्या तुलनेत या कांद्याला कितीतरी जास्त दर मिळतो. मार्च महिन्याच्या सुरवातीला बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याची मोठी माळ २५० ते ३००, तर छोटी माळ १५० ते २०० रुपयांनी विकली जाते. एप्रिल महिन्यात बाजारात कांद्याची आवक वाढली की दर काही प्रमाणात कमी होतात. पण हे दर लाल कांद्याच्या तुलनेत जास्तच राहतात. कांद्याला बाजारात असलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी उत्पादन हे दर जास्त असण्यामागचे मूळ कारण आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचे कसब शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे. यामुळेही कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होत आहे.

क्षमता असूनही निर्यातीपासून दूर का?

अलिबागच्या कांद्याला बाजारात चांगली मागणी आहे. या कांद्याची चव आणि गुणवत्ता चांगली आहे. पण ज्या तुलनेत मागणी आहे, त्या तुलनेत या उत्पादन होत नाही. त्यामुळे बहुतेक होणार कांदा हा स्थानिक बाजारपेठांमध्ये विकला जातो. त्यामुळे सध्या तरी हा कांदा निर्यातीपासून दूर आहे. पण यंदा प्रथमच ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही स्थानिक शेतकऱ्यांनी हा कांदा पाठवला आहे.

Harshad.kashalkar@expressindia.com