-ज्ञानेश भुरे

ऑस्ट्रेलियात २०२६मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती या खेळाला वगळण्यात आले. या स्पर्धेतून कुस्तीला वगळले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दोनदा कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीलाच वारंवार का वगळले जाते याचा घेतलेला आढावा…

Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
West Indies all rounder Sunil Narine confirmed on international retirement
आंतरराष्ट्रीय निवृत्तीवर नरेन ठाम! ट्वेन्टी२० विश्वचषकात विंडीजसाठी खेळण्यास नकारच
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

२०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला का वगळले?

ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जेव्हा घेण्यात येतात तेव्हा ऑलिम्पिक खेळांचा प्राधान्याने समावेश करण्यात येतो. त्यानंतर यजमान देश आपले अधिकार वापरून काही खेळांचा नव्याने समावेश करतो, तर काही खेळांना वगळतो. पुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलियात कुस्ती आणि तिरंदाजी हे दोन्ही खेळ प्रचलित नाहीत. अन्य स्पर्धांतही त्यांना या स्पर्धा प्रकारात यश मिळालेले नाही. केवळ याच कारणाने संयोजन समितीने या दोन्ही खेळाडूंना वगळण्याचा निर्णय घेतला. मुळात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घटनेनुसार केवळ ॲथलेटिक्स आणि जलतरण या दोनच खेळांना स्पर्धेत कायमचे स्थान आहे. बाकी सर्व खेळ हे यजमानांच्या मर्जीवर अवलंबून असतात.

भारतावर या निर्णयाचा किती फरक पडणार?

पदकसंख्येचा विचार केला, तर भारतासाठी या बदलाचा फारसा फरक पडेल असे सध्या तरी दिसून येत नाही. या वर्षी झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून इंग्लंडने अशाच पद्धतीने नेमबाजीला वगळले होते. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेत २०१०पासून नेमबाजी प्रकारात भारताने वर्चस्व राखले होते. भारताच्या पदकसंख्येत नेमबाजांनी कायमच भर घातली होती. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत भारताने नेमबाजीत १६ पदके मिळविली होती. कुस्तीमध्ये भारताने १२ पदके मिळविली होती. बर्मिंगहॅमला नेमबाजीला वगळल्यावर नेमबाजीची पदके कमी झाली. पण, कुस्तीतील १२ पदके कायम राहिली होती. म्हणजे भारताची ही पदके आता २०२६ मध्ये कमी होणार आणि नेमबाजीची वाढणार. थोडक्यात भारतासाठी या निर्णयाचा परिणाम संमिश्र म्हणता येईल. मात्र ज्या स्पर्धेत हे दोन्ही क्रीडा प्रकार खेळवले जातील, त्या स्पर्धेत सध्याच्या गुणवत्तेच्या बळावर भारताची पदके वाढतील आणि पदकतालिकेतील स्थान उंचावेल हेही वास्तव आहे.

कुस्तीला यापूर्वी किती वेळा वगळण्यात आले?

कुस्ती हा ऑलिम्पिक आणि सर्वांत जुना क्रीडा प्रकार असला, तरी राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात या खेळाचा समावेश पर्यायी खेळ म्हणून करण्यात आला. सर्वप्रथम १९३०पासून कुस्ती खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर १९९४ र्यंत या खेळाचा समावेश कायम होता. १९९८ मध्ये यजमान मलेशियाने १०-पिन बोलिंग खेळासाठी कुस्तीला वगळले. त्यानंतर २००२मध्ये पुन्हा कुस्तीचा समावेश करण्यात आला. पण, २००६ म्हणजे पुन्हा कुस्तीला वगळण्यात आले. या वेळी बास्केटबॉलच्या समावेशासाठी कुस्ती खेळावर गदा आली. त्यानंतर २०१०मध्ये पुन्हा कुस्तीचा समावेश करण्यात आला. बदल इतकाच झाला की २०१०पासून फ्री-स्टाईल प्रकाराचा समावेश करण्यात आला. तो २०२२ पर्यंत कायम होता.

कुणाचे किती वर्चस्व?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताचे वर्चस्व राहिले असले, तरी ते अलीकडच्या काळातील आहे. स्पर्धेचा १९३०पासूनचा इतिहास बघितला तर कॅनडाने (६९, ४८, ३०) सर्वाधिक १४७ पदके मिळविली आहेत. भारताच्या नावावर (४९, ३९, २६) ११४ पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने (१४, २२, १७) ५३ पदके मिळवली आहेत. दरम्यान, नेमबाजीत ऑस्ट्रेलियाने १९६६ ते २०१८ पर्यंत (७०, ५९, ४२) अशी सर्वाधिक १७१ पदके मिळविली आहेत. भारताच्या नावावर (६३, ४४, २८) १३५ पदके असून सहभागी देशांमध्ये या दोन देशांनी नेमबाजीत वर्चस्व राखले आहे.

कुस्तीला सातत्याने का वगळले जाते?

भारताने अलीकडच्याच काळात कुस्ती खेळात कमालीची प्रगती केली आहे. सुशीलकुमारच्या ऑलिम्पिक पदकापासून ही प्रगती सातत्याने दिसू लागली. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीत रशिया, अमेरिका, जॉर्डन, इराण अशा देशांबरोबर चीन आणि जपान या आशियाई देशांचाही दबदबा होता. पण, हे देश राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग नसतात. ओशियाना, आफ्रिका आणि ब्रिटिश द्वीपसमूहातील देशांमध्ये फारशी कुस्ती संस्कृती नाही. त्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या खेळाचा पर्यायी खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खेळ वगळायचे झाले की पहिली कुऱ्हाड कुस्तीवर पडते. त्यामुळे कुस्तीत पदक मिळविण्यापेक्षा कुस्तीच्या समावेशाची लढाई अधिक कठीण आहे.