भात कोंडय़ाचे (राईस ब्रॅन) तेल, ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल तेल, शेंगदाण्याचे तेल ही असंतृप्त मेदाम्ले जास्त प्रमाणात असलेली तेले स्वास्थ्याला चांगली असतात हे खरे आहे. पदार्थ तळण्यासाठी किंवा फोडणीसाठी ही तेले गरम केली की त्यात मोठय़ा प्रमाणावर ‘फ्री-रॅडिकल्स’ निर्माण होतात. ही फ्री-रॅडिकल्स शरीरांतर्गत विष म्हणून कार्य करतात. शरीराची झीज होण्याचा वेग वाढण्यापासून मधुमेह आणि अगदी कर्करोगापर्यंतच्या अनेक रोगांना ती कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे ही तेले कच्च्या स्वरूपात सेवन करणे लाभदायक आहे. पण त्याहीपेक्षा उत्तम सेवनप्रकार म्हणजे मूठभर शेंगदाणे, दोन चमचे तीळ, दोन चमचे अळशी, दोन बदाम या तेलबिया पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत टाकाव्यात. सकाळी ते पाणी फेकून देऊन भिजलेल्या तेलबिया पाच-सहा तास हवेत ठेवून द्याव्यात. या प्रक्रियेत तेलबियांच्या अंकुरीकरणाची प्रक्रिया चालू होते आणि प्रथिनांचे अमिनो आम्लांत, मेदाचे मेदाम्लात रूपांतर होते. बोनस स्वरूपात ‘बी’, ‘सी’ आणि ‘ई’ जीवनसत्वे तयार होतात. तसेच ‘अँटिऑक्सिडंट्स’ आणि एन्झाइम्सही तयार होतात. अँटिऑक्सिडंटस् म्हणजे ‘फ्री- रॅडिकलस’ या विषाला नष्ट करणारे अमृत आहे. या भिजवलेल्या तेलबिया जेवणाबरोबर खाता येतील. सुती कापडात बांधून कार्यालयातही नेता येतील. तेलबिया भिजत घातलेले पाणी प्यायल्यास अजून उत्तम. या तेलबियांची चटणी बनवून त्यात वर उल्लेखलेले स्वास्थ्यवर्धक कच्चे तेल घालून त्यासोबत भाकरी खाणेही चांगले. दुसरा एक पर्याय म्हणजे दुपारच्या चहाऐवजी एक काजू, तीन-चार न खारवलेले पिस्ते आणि अर्धा अक्रोड असे एकत्र चावून खाणे.
घाण्यातून निघालेले तेल (फिल्टर्ड ऑइल) पौष्टिक असल्याने आठ-दहा महिन्याहून जास्त काळ टिकत नाही. उत्पादकाला हे परवडणारे नसल्याने त्यावर कॉस्टिक सोडय़ाची प्रक्रिया केली जाते. अशा तेलाला ‘रिफाइंड ऑइल’ म्हणतात. हे तेल दोन-अडीच वर्षांहून जास्त काळ टिकू शकते. या प्रक्रियेमुळेच हे तेल किलोमागे ४०-५० रुपयांनी महाग असते. स्वास्थ्याला मात्र ते हानिकारक आहे. रक्ताचा पीएच आम्लतेकडे घसरल्यामुळे प्रथम कफविकार पुढे आम्लविकार आणि त्यानंतर वातविकार होतात. याविषयी समाजात खूप अज्ञान आहे. उपाहारगृहांमध्येही ‘आमच्याकडे सर्व पदार्थ शुद्ध रिफाइंड तेलात बनविले जातात.’ अशी पाटी भिंतीवर अभिमानाने लावलेली दिसते. पण अशा ठिकाणी ‘रिफाइंड म्हणजे काय रे भाऊ’ असा प्रश्न आपल्याला पडत नाही. ‘जे महाग ते श्रेष्ठ’ या समजुतीने आपण बाजारतून प्रक्रियायुक्त तेल खरेदी करून आपल्याच कुटुंबियांच्या आरोग्याची घाऊक वाट लावून घेत असतो.
दुर्दैवाने आज बाजारात फक्त शेंगातेल आणि तीळतेल फिल्टर्ड स्वरूपात (तेही नीट वाचून आणल्यास) उपलब्ध आहे, न पेक्षा तीही रिफाइंड स्वरूपातच मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. फिल्टर्ड सूर्यफूल तेल तर गावाकडेच बघायला मिळते. भात-कोंडय़ाचे तेल टिकायला फारच नाजूक असल्याने ते फिल्टर्ड स्वरूपात मिळण्याचा प्रश्नच येत नाही!
पॉलिश्ड तांदूळ स्वास्थ्याला चांगला नसतो, त्यामुळे वजनही वाढते. तर हातसडीचा तांदूळ कॉलेस्टेरोल, उच्चरक्तदाब, मधुमेह, हृद्रोग यांच्या प्रतिबंधासाठी चांगला असतो. तरीही आपण आधी तांदूळ पॉलिश करून त्याची वाट लावतो आणि त्याच तांदळाच्या कोंडय़ापासून काढलेले प्रक्रियायुक्त स्वरूपातील तेल मात्र ‘आरोग्याला चांगले’ या नावाखाली वापरून आरोग्याची दुप्पट वाट लावून घेतो! त्यापेक्षा हातसडीचे तांदूळच वापरा की! चांगल्या स्वास्थ्याकरीता      फोडणी आणि तळणे मर्यादित ठेवायला पर्याय नाही, मग तेल कोणतेही असू  द्या.