IPL 2020 FINAL MI vs DC: IPL 2020च्या अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. दुबईच्या मैदानावर झालेल्या फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले. Five time IPL CHAMPIONS @mipaltan #Dream11IPL pic.twitter.com/tBI6xF1J2E — IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020 - #MumbaiIndians WIN #Dream11IPL 2020 pic.twitter.com/1zU6GOj6Mj — IndianPremierLeague (@IPL) November 10, 2020 १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरूवात केली. क्विंटन डी कॉक १२ चेंडूत २० धावा करून माघारी परतला, पण रोहित शर्माने सुर्यकुमार यादवच्या साथीने डाव पुढे नेला. रोहितसोबत चांगली भागीदारी असतानाच सूर्यकुमार यादव धावचीत झाला. रोहित हळूच फटका खेळत एकेरी धाव घेण्यासाठी धावला पण रोहित-सूर्यकुमार यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. अखेर रोहित नॉन-स्ट्राईकला पोहोचल्याचं पाहून सूर्यकुमारने आपली क्रीज सोडली आणि स्वत:ला धावबाद करवून घेतलं. सूर्यकुमारने २० चेंडूत १९ धावा केल्या. रोहितने मात्र सूर्यकुमारच्या विकेटचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं नाही. त्याने ५१ चेंडूत दमदार ६८ धावा कुटल्या. रोहितची दमदार खेळी तो बाद झाल्यावर इशान किशन आणि कृणाल पांड्या जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मुंबईचे हे पाचवे IPL विजेतेपद ठरले, तर रोहितसाठी एखाद्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना हे सहावे IPL विजेतेपद ठरले. २००९ला डेक्कन चार्जर्सच्या IPL विजेत्या संघातही रोहितचा समावेश होता. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. स्टॉयनीस (०), अजिंक्य रहाणे (२) आणि शिखर धवन (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी ९६ धावांची भक्कम भागीदारी केली. ऋषभ पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने योग्य वेळी कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. श्रेयसचं धडाकेबाज अर्धशतक श्रेयस अय्यरने ५० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार खेचत नाबाद ६५ धावांची खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली. ट्रेंट बोल्टने ३, कुल्टरनाईलने २ तर जयंत यादवने १ बळी टिपला.