महाविद्यालयातील सत्र संपत आले की विद्यार्थ्यांची धावपळ सुरू व्हायची ती प्रकल्प तयार करण्यासाठी. पण यापुढे विद्यार्थ्यांनी ही धावपळ करायची गरज भासणार नाही. कारण श्रेणी आधारित गुणांकन पद्धतीच्या नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी वेगळे गुण नसतील. त्यामुळे प्रकल्पाच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे.
विद्यापीठाने सुरू केलेल्या नव्या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना ६०:४० ऐवजी ७५:२५ असे गुण दिले जाणार आहेत. यातील ७५ गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. तर उर्वरित २५ गुणांमध्ये २० गुण हे वर्गातील परीक्षांना असतील तर पाच गुण हे वर्गातील वागणूक आणि विद्यार्थ्यांचा इतर गोष्टींमधील सहभाग याला असणार आहेत. यातून प्रकल्पाला असलेले गुण वगळण्यात आले आहेत. मोठा गाजावाजा करत विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी श्रेणी आधारित गुणांकन पद्धत राबविण्यास सुरुवात केली होती. यानंतर मात्र या पद्धतीला शिक्षक वर्गाकडून मोठा विरोध होऊ लागला. मार्काच्या वाटपात महाविद्यालयांमध्ये खूप तफावत असल्याने निकालावरही परिणाम होऊ लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारीही वाढू लागल्या. हा वाढता विरोध लक्षात घेत विद्यापीठाने या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी एका समितीचीही स्थापना केली.
या समितीच्या शिफारशीनुसार ७५:२५ ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत सभेच्या बठकीत घेण्यात आला. यानंतर २५ गुणांचे विभाजन हे १५ गुण वर्गातील परीक्षा पाच गुण वर्गातील सहभाग आणि पाच गुण इतर सहभागासाठी देण्यात यावे असे सूचित करण्यात आले. मात्र शिक्षकांनी यालाही विरोध केला. यातील १० गुण देणे हे कठीण जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यानुसार विद्यापीठाने यात पुन्हा बदल करून २५ गुणांची विभागणी लेखी परीक्षा आणि वर्गातील वर्तणूक या दोन विभागांमध्ये केली. यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसून हा अहवाल फेरविचारासाठी समितीकडे पाठविण्यात आला आहे. पण या दोन्हीपकी कोणतीही पद्धत मंजूर झाली तरी विद्यार्थ्यांची ‘प्रकल्पा’तून सुटका होणार हे नक्कीच.
बहुतांश विद्यार्थी हे गुगल, विकीपीडिया अशा विविध संकेतस्थळांवरून प्रकल्प जसेच्या तसे उतवून घेत होते. यामुळे अनेकदा गुण देण्यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वादावादी होत असे. विद्यार्थी तक्रार निवारण कक्षात अशा प्रकारच्या तक्रारींचा नेहमीच खच असायचा. एका विद्याíथनीला प्रकल्पात शून्य गुण दिले म्हणून तिचे वर्षही वाया गेल्याचे उदाहरण आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रेणी आणि गुणांकन पद्धतीचे नवे रूप लवकरच विद्यार्थ्यांसमोर येईल पण ते विद्यार्थ्यांच्या हिताचे असेल, असा विश्वास विद्वत सभेच्या एका सदस्याने व्यक्त केला.