कोल्हापूर : इचलकरंजी शहराला सुळकुड नळ पाणी योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचं अशा घोषणा देत स्त्री-पुरुष आंदोलन आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरले होते. योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत नाही. मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याच्या शब्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. अद्यापही बैठक झालेली नाही. तसेच लोकप्रतिनिधींचेही या योजनेकडे दुर्लक्ष आहे.

हेही वाचा… काँग्रेसमध्ये ‘सतेज’ नेतृत्वाचा काळ सुरू – बाळासाहेब थोरात

यामुळे आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून चार महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सकाळपासून जमत होते. महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली.

आता नाही तर कधीच नाही, सुळकुड नळ पाणी योजनेचे पाणी मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांचा वाटणीचा एक थेंबही नको पण इचलकरंजीचे पाणी मिळालेच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. तसे फलके आंदोलकांच्या हाती होते. आंदोलनामध्ये महिलांचा उत्साह अधिक होता.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सुळकुड पाणी योजनेकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे टीका यावेळी करण्यात आली.आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्याचा निर्यात निर्धार यावेळी करण्यात आला.

हेही वाचा… बाजार समितीत कायमस्वपरूपी प्रशासक नेमणुकीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा.. ; राजू शेट्टी यांचा इशारा

प्रकृती खालावली

सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिला उपोषणास बसल्या आहेत. त्यांना सर्व स्‍तरातून पाठिंबा मिळत आहे. तिसऱ्या दिवशी उपोषणामधील महिलांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुश्रिफांना साकडे

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी मुंबई येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. यावेळी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे उपस्थित होते.