कोल्हापूर: करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा जोतिबा या दोन मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येत असल्याचे निवेदन मंगळवारी देवस्थान समितीने जारी केले आहे.

महालक्ष्मी व जोतिबा या दोन्ही मंदिरांतील धार्मिक वातावरण, पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समितीच्या पत्रकात म्हटले आहे. तोकडे कपडे किंवा अशोभनीय पोशाख घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

मंदिरात येणाऱ्या सर्वांना ही वस्त्रसंहिता लागू असणार आहे. धार्मिक विधी आणि मंदिराच्या शुद्धतेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी साडी, सलवार-कुर्ता, धोतर, पायजमा-कुर्ता यासारखे कपडे परिधान करावेत. या नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन समितीने केले आहे.

निर्णयाचे स्वागत

मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक कपडे परिधान करण्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे ३० मार्च रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार आज घेतलेला निर्णय हा स्तुत्य असून, त्याचे स्वागत करीत असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमोद सावंत, अभिजित पाटील, प्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे.

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर-आई अंबाबाईदेवी मंदिरात, तसेच श्री जोतिबा देवस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना, तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक कपडे परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरे ही हिंदू धर्माची श्रद्धेची जागा आहे. भाविक आणि भक्तांना मनःशांती प्रदान करणारी आणि अव्याहतपणे आध्यात्मिक ऊर्जा पुरवणारी केंद्रे आहेत. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांच्या रक्षणासाठी अन् हिंदूंच्या जीवनाचा अविभाज्य घटक असणाऱ्या मंदिरांचे पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय हा स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया देत भाविकांनी याचे स्वागत केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी. वस्त्रसंहितेचा मुख्य उद्देश हा भारतीय संस्कृतीला, परंपरेला साजेशी वस्त्रे परिधान करावीत हा आहे. आधुनिकतेकडे वळताना वस्त्रसंहितेच्या संदर्भात पालन व्हावे, या दृष्टीने ३० मार्च या दिवशी श्री महालक्ष्मीदेवी-अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावर मंदिर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळात मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करावी, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली होती.