कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरून अवजड मालवाहतूक (कार्गो सेवा) सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विमानतळावर होणाऱ्या तीन हजार मीटर लांब धावपट्टीतून पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती मिळेल. विमानतळावर फ्लाइट ट्रेनिंगसाठी एफटीओ (फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी मुंबई एव्हिएशन सेंटरमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे स्पष्ट केले.

कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन मंत्री मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.पालकमंत्री प्रकाश आबिटकर, धनंजय महाडिक, शाहू महाराज छत्रपती, धैर्यशील माने हे खासदार, अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोक माने हे आमदार, भाविप्रा सदस्य एम. सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, विमानतळ संचालक अनिल शिंदे उपस्थित होते.

राजाराम महाराजांचे नाव

कोल्हापूर विमानतळ उभारण्याची संकल्पना मांडणारे ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण करण्याच्या कोल्हापूरकरांच्या दीर्घकालीन मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला आहे. मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

नागपूर सेवा सुरू

नागपूरहून ४२ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. कोल्हापूरहून नागपूरला ४९ प्रवासी गेले. एका महिला प्रवाशास मंत्री मोहोळ यांनी तिकिटाचे वितरण केले.