लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी पती, भाऊ आणि कुटुंबीयांनी केलेला पाठपुरावा उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. बिद्रे यांचा खून, न्यायालयीन प्रक्रिया ही मुंबई -पनवेल परिसरात घडली असली तरी त्याची सुरुवात मात्र कोल्हापूर -सांगली जिल्ह्यातून झाल्याने या भागातील नागरिकांचे या निकालाकडे लक्ष लागले होते.

बिद्रे या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचे वडील सैन्यात होते. भाऊ-बहीण हे उच्चशिक्षित. पुढे त्यांचा विवाह हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष राजू गोरे यांच्याशी झाला होता. उभयतांना साक्षी नावाची एक मुलगी आहे. बिद्रे या सांगली येथे पोलीस सेवेत होत्या. तेव्हा त्यांचा संपर्क बड्या राजकीय नेत्यांमध्ये उठबस असलेल्या अभय कुरुंदकर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी आला. एका गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री, प्रेमसंबंध वाढत गेले.

पुढे अश्विनी यांची बदली रत्नागिरी येथे झाली. तेथेही कुरुंदकर भेटायला येत असे. याच दरम्यान दोघांमधील वाद वाढत गेले. घरातील छुप्या सीसीटीव्हीमध्ये दोघातील भांडणे चित्रित झाली होती. पुढे बिद्रे यांचा मिरा रोड परिसरात खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

सुरुवातीला याबाबत शांतताच होती. काही कालावधीनंतर पती राजू गोरे, भाऊ आकाश बिद्रे यांनी कुरुंदकर हा खुनाचा सूत्रधार असल्याची माहिती कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथे पोलिसात जाऊन दिली. कोणीही अधिकारी त्यांची दखल घेत नव्हते. उलट अश्विनीच्या वर्तणुकीची चर्चा करून अधिकारी त्यांना पिटाळून लावत होते.

अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात ४ ऑक्टोबर २०१६ रोजी याचिका दाखल केली. पुढे कुरुंदकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढे, गोरे व त्यांची ९ वर्षांची मुलगी सिद्धी यांनी राष्ट्रपती, मुख्य न्यायमूर्ती यांना निवेदन देऊन न्याय मिळत नसल्याने इच्छामरणाची परवानगी मागितली होती. याची दखल घेऊन राष्ट्रपतींनी राज्याच्या मुख्य सचिवांना लक्ष घालण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती राजेश अस्मर यांच्याकडून न्याय मिळणार नसल्याने खटला काढून तो अन्य न्यायालयात चालवावा, अशी तक्रार गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांकडे केली होती. यानंतर याची सुनावणी होवून आज मुख्य संशयित आरोपी कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली नऊ वर्षे सातत्याने आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला. न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, पनवेल, मुंबई अशा फेऱ्या केल्या. मुख्य आरोपीकडून प्रकरणाला वेगळे वळणे देण्याचे कसोशीने प्रयत्न करण्यात आले. विशेष सरकारी वकील, तपास अधिकारी, माध्यमाने वाचा फोडल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. -राजू गोरे