कोल्हापूर : दुष्काळात तेरावा महिना हि म्हण सर्वांना परिचित असली तरी कोल्हापूरकरांवर मात्र पावसाळ्यातच तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे काळम्मवाडी नळपाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असताना आता या योजनेच्या जलवाहिनीला मोठी गळती लागण्याचा प्रकार बुधवारी राधानगरी तालुक्यात घडला. दरम्यान, आजही शहरात २१ टँकरद्वारे ६३ फेऱ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.
काळम्मवाडी नळपाणी योजनेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराला दोन दिवस पाणी पुवठा होऊ शकला नाही. हे काम काल रात्री पूर्णत्वास आले. काळम्मवाडी धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. एक काम पूर्ण होत असताना दुसरे संकट उद्भवले.
गळती आणखी किती काळ ?
आज सोळांकूर (ता. राधानगरी) येथे या नळपाणी योजनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल्याने ग्रामस्थानी संताप व्यक्त केला. सततची गळती होण्यापेक्षा या मार्गावर लक्षपूर्वक पाहणी करून ती कायमची दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
तंगडतोड थांबणार कधी ?
एकीकडे कोल्हापूरकरांना पाणी टंचाईमुळे तंगडतोड करावी लागत असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या बेभरवशी कारभारामुळे जलवाहिनी वारंवार नादुरुस्त होत आहे. शहरात नेहमीच पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.