कोल्हापूर : मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या जीबी डेटा मध्ये ३०० ते ३५० कोटींची फसवणूक केली जाते, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्रव्यवहार करून या संदर्भातील माहिती दिली आहे.

देशभरातील १०६ कोटींहून अधिक मोबाईल धारकांना रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांकडून १ जुलैपासून मोबाईल सेवांच्या (रिचार्जच्या) दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर या कंपन्यांकडून दररोज ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी दिल्या जाणाऱ्या जीबी डाटामध्ये हेराफेरी होत असून दररोजच्या वापरातील कोणताही डेटा या कंपन्यांकडून ग्राहकांना दिला जात नाही. यामधून एका रिलायन्स जीओ कंपनीकडून ३०० ते ३५० कोटी जीबी डेटाची फसवणूक होत आहे.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यात नऊ नद्या धोका पातळीवर

देशामध्ये १०६ कोटी मोबाईल धारक दैनंदिन प्रति महिना सरासरी २२ जीबी इंटरनेट डेटा वापर गृहीत धरता वरील सर्व कंपन्यांची मिळून जवळपास २६०० कोटी जीबी डेटा दरमहा ग्राहकांना वापरास दिला जातो. यामधील ७०० ते ८०० कोटी जीबी डेटा या कंपन्यांकडून चोरी करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. या डेटा मधून ग्राहक फेसबुक , एक्स (ट्वीटर ) , इंन्स्टाग्राम , व्हॅाटसअप , रिल्स , युट्यूब याकरिता या डेटाचा वापर करतात.

मात्र वरील कंपन्यांच्यावतीने जो डेटा दिला जातो त्यातून तो डेटा कशा कशासाठी, किती जीबी किंवा एमबी वापरला जातो याची कशाचीच माहिती ग्राहकांना दिली जात नाही. या डेटा वापरामध्ये ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याची दिसून येत आहे. याबाबत केंद्र सरकारने तातडीने या कंपन्यांना सेवा प्रदात्याने घोषित केलेल्या गतीनुसार नेटवर्क कनेक्शनच्या इंटरनेट गतीचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: राधानगरी, काळम्मावाडी धरणातील विसर्ग वाढल्याने कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर

इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी वापरलेली उपकरणे कॅलिब्रेट केली पाहिजेत, अन्यथा ग्राहकांची नेहमीच फसवणूक होणार आहे. देशातील मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांकडून प्रतिमहिना आकारण्यात आलेल्या रिचार्जवरून दैनंदिन सरासरी ६ रूपये ८१ पैसे प्रति ग्राहक सेवा शुल्क वसूल केले जाते. यामधून या कंपन्याना दैनंदिन सरासरी ७२२ कोटी रूपये तर मासिक २१६६० हजार कोटी रूपयाचे उत्पन्न मिळते यापैकी दरमहा ५ हजार ४०० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची या डेटा चोरीतून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : राष्ट्रपती रविवारी वारणेच्या दौऱ्यावर; पाऊस झेलत शासकीय यंत्रणा कार्यरत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे वरील कंपन्यांनी फेसबुक , एक्स (ट्वीटर ) , इंन्स्टाग्राम , व्हॅाटसअप , रिल्स , युट्यूब याकरिता किती डेटाचा वापर केला जातो त्याचा सेवा प्रदात्याने घोषित केलेल्या गतीनुसार नेटवर्क कनेक्शनच्या इंटरनेट गतीचे परीक्षण करून इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी वापरलेली उपकरणे कॅलिब्रेट केली पाहिजेतक. याचा दैनंदिन मेसेज संबधित ग्राहकांना पाठविण्याची मागणी शेट्टी यांनी मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली आहे.