कोल्हापूर : पर्यावरणदिनानिमित्त जाणीव जागृती होण्यासाठी ‘अवनि संस्था व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स’च्या पुढाकाराने तसेच ३२ सामाजिक संस्थांच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा हा उपक्रम ५ जून ते ८ जून या चार दिवसांत येथे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पहिल्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. जय सामंत, पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. मंजुळा पिशवीकर यांचे पुनर्चक्रीकरणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन होईल. आंतरराष्ट्रीय कचरावेचक आघाडीच्या उपाध्यक्ष सुशीला साबळे यांच्या उपस्थितीत उत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

पुनर्चक्रीकरण केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री शाहू स्मारक भवनच्या कलादालनामध्ये होणार आहे. चार दिवस दररोज सायंकाळी ३ ते ६ या वेळेत टेरेसवरील परसबाग, घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे, पर्यावरण पत्रावळी, रानभाज्यांचे महत्त्व, टाकाऊ नैसर्गिक पदार्थांपासून बायो एंजाइन्स बनविणे यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी शरद आजगेकर, संजय पाटील, अनिल चौगुले, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, संगीता लाखे, भारती कोळी उपस्थित होते.

अवनि संस्था गेले पंधरा वर्षे कचरा वेचकांच्या प्रश्नावर कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १२३० कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. तर सांगली येथे ४२० व सातारा जिल्ह्यात ५५० कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. कचरा वेचक भगिनी या उदरनिर्वाहासाठी विक्री योग्य प्लास्टिक व लोखंड रस्त्यावरून फिरून गोळा करतात व विक्री करून कुटुंब चालवतात. त्याच्या या कामाचा फायदा त्याच्यापेक्षा जास्त पर्यावरणाला होतो. रस्त्यावरून तसेच कोंढाळ्यातून कचरा गोळा करताना फक्त पुनर्चक्रीकरण होणारा व योग्यच कचरा उचलला जातो. यामध्ये कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणांमध्ये योगदान असल्यामुळे सरकारने २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यात त्यांचा समावेश केला आहे. त्यांना ओळखपत्र म.न.पा व जिल्हा परिषदेने दिले पाहिजे.

त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेतले पाहिजे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट निर्देश आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आपले शहर आणि संपूर्ण जिल्हाभर कचऱ्याचे ढीग आढळतात. तसेच नागरिकांनी घंटागाडीकडे ओला सुका कचरा वेगळा करून द्यायचा आहे, परंतु तेही होताना दिसून येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुनर्चक्रीकरणामध्ये वैज्ञानिक प्रक्रियेसाठी कचरा विलगीकरण केंद्र स्थापन करून त्यात विभागानुसार कचऱ्याचे वर्गीकरण होणे कायद्यानुसार अपेक्षित आहे परंतु त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पुनर्चक्रीकरण योग्य होत नाही. कचरा ही रस्त्यावर तसेच डम्पिंग ग्राउंडवर सहज नष्ट होत आहे. पुनर्चक्रीकरण करण्यात प्रत्येक वस्तूला विशिष्ट किंमत व मूल्य आहे. ती जबाबदारी फक्त कचरा वेचकांची नसून सर्व नागरिकांची आहे, असे यावेळी सांगण्यात आले.