कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पासून कोल्हापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल चौकात करवीरनगरीचे नवीन आकर्षक प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हे काम लवकरच सुरू होईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी या ठिकाणी दिलेल्या भेटी वेळी जाहीर केले.
कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झाली असून काही ठिकाणी यांची पडझड झालेली आहे. त्या धोकादायक बनल्या आहेत. या स्वागत कमानीतून हजारो वाहने दररोज प्रवास करीत असतात.एखादी दुर्घटना झाल्यास प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मनपा अधिकाऱ्यांसमवेत या कमानीची पाहणी केली.
यावेळी आमदार क्षीरसागर यांनी, सदरच्या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता कमान पूर्णपणे उतरवून घेणे आवश्यक आहे. येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सदरची कमान उतरवून घेण्यात यावी. शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, असे मनपा अधिकार्यांना सूचना देताना सांगितले.
कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा रचना ( डिझाईन) स्पर्धा घ्याव्यात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी, पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वाराची रचना करण्यात यावी. हे प्रवेशद्वार पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गातून कोल्हापूरमध्ये प्रवेश करणाऱ्या तावडे हॉटेल जवळ उभारण्यात येणार असल्याने जागा देखील मोठी मिळेल.
या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला असून तीन कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. हा विषय समाज माध्यमाच्या माध्यमातून दाखवला, त्यांचे देखील अभिनंदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, स्ट्रक्चरल ऑडिटर श्री.हडकर, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
तावडे हॉटेलचा इतिहास
राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करावयाच्या ठिकाणी एक कौलारू घर होते. तेथे शंकर कदम उर्फ तावडे हे वाहनधारक , प्रवासी यांच्यासाठी छोटेखानी हॉटेल चालवत होते. १९४० साली सुरू झालेले हॉटेल ही कोल्हापूरची प्रवेशद्वाराची ओळख बनली आहे. गेली २५ वर्ष या ठिकाणी आता हॉटेलचे अवशेष उरलेले नाहीत. परंतु तावडे हॉटेल थांबा हा मात्र सर्वांच्याच परिचयाचा आहे. येथे उभारण्यात आलेली कमान आता नादुरुस्त झाली आहे. तेथे नव्याने कमान उभारण्याचा प्रयत्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी चालवला आहे.