कोल्हापूर : कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एका बैठकीत चांगलेच वाभाडे काढले. प्राधिकरण लोकांच्या कामांसाठी आहे. येथे प्रत्येक कामात दिरंगाई केल्याच्या तक्रारी आहेत. वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करावा. एखादा अधिकारी निवृत्त झाला असला, तर त्याचे निवृत्तीवेतन थांबवावे, अशा सक्त सूचना त्यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना केल्या.
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर प्राधिकरणात समाविष्ट ४२ गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असावा. त्यासाठी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करावा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांनी विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. दिलीप कदम यांनी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.