कोल्हापूर : एका निर्भया प्रकरणामुळे सत्तांतर घडले होते हा इतिहास राज्यकर्त्यांना नजरेआड करुन चालणार नाही. आपल्या माता-भगिनींचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशभरात महिलांवर अत्याचार आणि मानवतेला काळीमा फासणार्या घटना घडत असतील नागरिक गप्प बसणार नाहीत हा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे. अशा घटना घडतील तर त्याला आम्ही प्राणपणाने विरोध करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.
हेही वाचा >>> कोल्हापुरात एका दिवसात पुराचे नियोजन बदलले; शाळा सुरु, विद्यापीठाच्या परीक्षा मात्र स्थगित
मणिपूर येथे सुरु असलेला हिंसाचार आणि मानवतेला काळीमा फासणार्या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर ७२ तासांचे अन्नत्याग व आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनाची गुरुवारी सुमनदेवी प्रकाश चव्हाण (शिरोळ), सुलभाताई रावसाहेब पाटील (टाकवडे), उज्वला जोतिराम चौगुले (अतिग्रे) व सुनिता विजय मोरे (सांगली) या वीरपत्नींच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांनी नारळपाणी पिऊन आंदोलनाची सांगता केली.
हेही वाचा >>> पश्चिम घाटात भूस्खलनाच्या प्रमाणात वाढ; शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील अभ्यासकांचे संशोधन
या आंदोलनाच्या तिसर्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळा मार्गावर कॅण्डल मार्च काढण्यात आला. शहरातील विविध सामाजिक संघटना, पुरोगामी राजकीय विचारसरणीचे अनेक नेते आणि जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी खासदार शेट्टी यांनी, एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या माता-भगिनींच्या अब्रुचे संरक्षण करण्यासाठी आणि ज्या पिडीत महिला आहेत त्यांचे रक्षण करण्यात आपण असमर्थ ठरलो याचे प्रायश्चित म्हणून हे अन्नत्याग आंदोलन केले आहे. पण माता-भगिनींनो घाबरु नका, राज्यकर्ते जर रक्षण करु शकणार नसतील तर आम्ही भारतीय तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि रक्षण करु, असेही सांगितले. पंतप्रधानांनी हा मुद्दा गांभिर्याने घ्यावा असेही त्यांनी नमुद केले.