भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजीनं नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय गोलंदाजनं केलेल्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियावर ३१ वर्षापूर्वीच्या विक्रमाची नामुष्की झाली आहे. दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. ३१ वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघावर अशीच नामुष्की आली होती. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजासमोर कांगारुंनी गुडघे टेकले. दोन्ही डावात कागांरुंना २०० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावा करता आल्या होत्या तर दुसऱ्या डावात २०० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघानं पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटी विजयासाठी भारतीय संघासमोर फक्त ७० धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.

आणखी वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत अश्विननं रचला इतिहास; मुरलीधरनचा मोठा विक्रम मोडला

३१ वर्षापूर्वी काय झालं होतं?
१९८८-८९ मध्ये वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाविरोधात भेदक मारा केला होता. या सामन्यात दोन्ही डावात एकाही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नव्हती. सध्या सुरु असलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावसंख्या मार्नस लाबुशाने (४८) केल्या आहेत.

आणखी वाचा- आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप

भारतीय संघाचा भेदक मारा –
पहिल्या डावात बुमराहनं ४ बळी घेतले होते. तर अश्विनने तीन बळी घेतले होते. सिराजने दोन तर जाडेजानं एक बळी घेतला होता. दुसऱ्या डावात सिराजनं तीन बळी घेतले होते. तर बुमराह, जाडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले आहेत. तर उमेश यादवला एक विकेट मिळाली आहे.