श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी योग्यवेळी संयम आणि गरजेच्या वेळी फटकेबाजी करत पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात घडला अनोखा विक्रम, जाणून घ्या…

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग यशस्वीपणे करणाऱ्या संघाच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे. २०० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करण्याची टीम इंडियाची ही चौथी वेळ ठरली.

भारत आणि ऑस्ट्रेलियाव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश आणि कतार या देशांनीही एकवेळा २०० पेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : राहुल, नाम तो सुना ही होगा ! संघाच्या विजयात बजावली मोलाची भूमिका

दरम्यान, भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लोकेश राहुलने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.