पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर ४ गडी राखून भारताने मात केली. मात्र ९६ धावांचं आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांना शर्थीचे प्रयत्न करावे होते. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली.

रोहित शर्माने पहिल्याच षटकात चौकार ठोकत भारतीय डावाची सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने ख्रिस गेलशी बरोबरी केली आहे. गेल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत ४-४ वेळा अशी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत सहावेळा अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

दरम्यान विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने दुसऱ्या सामन्यात अर्धशतकही झळकावलं आहे. ६७ धावांची खेळी करुन तो माघारी परतला.