मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया उत्सुक

या वर्षांतला पहिला एकदिवसीय सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या वाटेवर परतला आहे. दुसरीकडे भारताच्या सलग विजयांची मालिका खंडित झाली आहे. तिन्ही सामने जिंकत भारताने ही मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळेच हा अखेरचा सामना जिंकत शेवट गोड करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

हार्दिक पंडय़ाच्या रूपात भारताला भरवशाचा अष्टपैलू खेळाडू या मालिकेत मिळाल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांनाही सूर गवसला आहे. केदार जाधवही आता फॉर्मात आल्याचे दिसत आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन्ही फिरकीपटूंनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. महेंद्रसिंग धोनीनेही टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. घरच्या मैदानात वेगवान गोलंदाज उमेश यादव कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भारताचा सध्याचा फॉर्म चांगला आहे. गेल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी या सामन्यात ते त्वेषाने उतरतील, अशीच चिन्हे आहेत.

गेल्या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोबल नक्कीच उंचावले असेल. पण या सामन्यात त्यांना कामगिरीत सातत्य राखता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. डेव्हिड वॉर्नरने गेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. आरोन फिंचही दमदार फलंदाजी करत आहे. स्टीव्हन स्मिथ आणि मार्क्स स्टोइनिस या दोघांनी आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठय़ा अपेक्षा असतील. मात्र, मालिकेचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. पण गेल्या सामन्यातील विजय त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरू शकतो.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, ट्रेव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अ‍ॅश्टॉन अगर, अ‍ॅडम झम्पा, पीटर हॅण्ड्सकोम्ब, आरोन फिंच.

खेळपट्टीचा अंदाज

जामठाची खेळपट्टी ही भारतासाठी जास्त फलदायी ठरलेली नाही. चार वर्षांपूर्वी या दोन्ही संघांतील सामन्यात  ऑस्ट्रेलियाने ३५० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याचबरोबर २०१६ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला न्यूझीलंडने ७९ धावांमध्ये तंबूत धाडले होते. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना येथे झाला होता आणि आयसीसीने खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. पण ही खेळपट्टी नव्याने बनवण्यात आली असून एक चांगला सामना पाहायला मिळेल, अशी आशा क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांनी व्यक्त केली आहे.‘जे काही यापूर्वी घडले तो इतिहास झाला. आता नव्याने खेळपट्टी बनवण्यात आली आहे. खेळपट्टीवरील माती बदलण्यात आली आहे. त्यामुळे खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळेल. त्यामुळे हा सामना पाहण्यास क्रिकेट रसिकांना आनंद येईल,’ असे हिंगणीकर यांनी सांगितले.

सामन्याची वेळ : दुपारी १:३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.