ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 4 धावांनी विजय मिळवत सामन्यामध्ये बाजी मारली. सध्या कांगारुंचा संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. 17 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावांपर्यंत मजल मारली, डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताला विजयासाठी 174 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात जरी खराब झाली असली तरीही शिखर धवन, कार्तिक-पंत जोडीने संघाचा डाव सावरला. मात्र पंत माघारी परतल्यानंतर भारताच्या हातातून सामना पुन्हा निसटला. कर्णधार विराट कोहलीने पंतची विकेट आपल्या संघासाठी निर्णायक क्षण ठरल्याचं मान्य केलं आहे.

“आजचा सामना खरचं उत्कंठावर्धक झाला. आमची सुरुवात खराब झाली, मात्र मधल्या फळीत फलंदाजांनी डाव सावरला. दिनेश कार्तिक-ऋषभ पंत मैदानात असेपर्यंत सामना हातात आहे असं वाटत होतं, मात्र ऋषभ माघारी परतल्यानंतर सगळी परीस्थिती बदलली. ऋषभची विकेट सामन्याचा निर्णायक क्षण होता.” Match presentation दरम्यान विराट कोहलीने भारतच्या पराभवाचं कारण नमूद केलं.

आजच्या सामन्यात शिखर धवनने 42 चेंडूंमध्ये 76 धावांची खेळी केली. विराटने शिखर धवनच्या खेळीचंही कौतुक केलं. यानंतर 23 आणि 25 नोव्हेंबरला या मालिकेतला दुसरा आणि तिसरा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.