भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडची दाणादाण उडवत दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले आहे. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था ५ बाद १०३ अशी आहे. इंग्लंडचा संघ अजूनही ३५२ धावांनी पिछाडीवर आहे. आर.अश्विनने आपल्या फिरकी जादूने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले, तर जयंत यादव व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिवसाच्या अखेरीस भारताने सामन्यावर पकड निर्माण केली असून उद्याच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरूवातीलाच मोहम्मद शमीने जोरदार धक्का दिला. शमीने आपल्या भेदक माऱयाने इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कूक याचा त्रिफळा उडवला. कूक स्वस्तात बाद झाल्यानंतर जो रुट आणि हमीद यांनी संयमी फलंदाजी करत मैदानात जम बसविण्यास सुरूवात केली. दुसऱया सत्राच्या अखेरीस इंग्लंड १ बाद ३४ अशा स्थितीत होता. त्यानंतर जयंत यादवने दिलेल्या अफलातून थ्रोवर हमीद धावचीत झाला. जो रुटने अर्धशतक ठोकून संघाच्या धावसंख्येला सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण अश्विनच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रुट ५३ धावांवर झेलबाद झाला. रुट बाद झाल्यानंतर अश्विनने डकेटचा त्रिफळा उडवून इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरणार इतक्यात जयंत यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेट घेतली. जयंत यादवने मोईन अलीला पायचीत केले. अश्विन आणि जयंत यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडचे फलंदाज निष्प्रभ ठरताना दिसले. दिवसाच्या अखेरीस बेअरस्टो आणि बेन स्टोक्स प्रत्येकी १२ धावांवर नाबाद आहेत. सामन्याच्या दुसऱया दिवशी विराट कोहली १६७ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाच्या त्वरित दोन विकेट्स पडल्या. अश्विनने यावेळी अर्धशतकी खेळी साकारून संघाला ४०० धावांचा टप्पा गाठून दिला. पर्दापणवीर जयंत यादवने यावेळी अश्विनला चांगली साथ दिली. अश्विन ५८ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, तर जयंत यादव मोठा फटका मारण्याच्या नादात रशीदच्या फिरकीवर ३५ धावांवर बाद झाला. दुसऱया दिवशी उपहारापर्यंत ७ बाद ४१५ अशी धावसंख्या उभारली. सकाळच्या सत्रात एकूण २९ षटकांचा खेळ झाला, यात इंग्लंडच्या मोईन अलीने अफलातून गोलंदाजी करत तीन विकेट्स मिळवल्या, तर अश्विन आणि जयंत यादवने अर्धशतकी भागीदारी रचली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस १५१ धावांवर नाबाद असलेला कोहली आज आपले द्विशतक साजरे करणार, याची उत्सुकता सर्वांना होती. पण इंग्लंडच्या मोईन अलीने कोहलीला १६७ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद केले. बेन स्टोक्सने कोहलीचा झेल टीपला. कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघाला उतरती कळा लागलेली पाहायला मिळाली. मोईन अलीने वृद्धीमान साहा(३) आणि जडेजाला तर शून्यावर माघारी धाडले. सकाळच्या सत्रात मोईन अलीने आतापर्यंत तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. साहा आणि जडेजा माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर जयंत यादवने अश्विनला चांगली साथ देत अर्धशतकी भागीदारी रचली. अश्विन आणि जयंत यादव बाद झाल्यानंतर उमेश यादवने दाणपट्टा चालवला आणि संघाला ४५० चा आकडा गाठून दिला. रशीदच्या फिरकीवर उमेश यादवने खणखणीत फटका हाणला होता, पण मोईन अलीने स्वेअर लेगला यादवचा झेल टीपला आणि भारतीय संघाचा पहिला डाव ४५५ धावांवर संपला. तत्पूर्वी, भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस ४ बाद ३१७ धावा केल्या होत्या. विराटने कर्णधारी खेळी करून नाबाद १५१ धावा केल्या, तर पुजाराने आपला दमदार फॉर्म कायम राखत शतकी खेळी साकारली. विराट आणि पुजाराच्या २२६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला दिवसाच्या अखेरीस ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला. सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारलेल्या भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाची सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. गौतम गंभीरऐवजी संघात स्थान देण्यात आलेला लोकेश राहुल सामन्याच्या दुसऱयाच षटकात शून्यावर बाद झाला. चांगल्या फॉर्मात असलेला मुरली विजय इंग्लंडच्या जेम्स अँडरसनच्या बाऊन्सवर झेलबाद झाला. विजयने २० धावा केल्या. पहिले दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. उपहारापर्यंत भारत २ बाद ९२ धावा अशा स्थितीत होता. दुसऱया सत्रात कोहली आणि पुजारा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता मैदानात जम बसवला. तिसऱया सत्रात पुजाराने रशीदला खणखणीत षटकार ठोकून आपले शतक साजरे केले, तर विराट कोहलीने १५६ चेंडूत शतक ठोकून आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील आपले १४ वे शतक पूर्ण केले. Cricket Score, India vs England - दिवसभरातील संपूर्ण अपडेट्स-