आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेला असताना, प्रत्येक संघमालक आपल्या संघातील महत्वाच्या खेळाडूंना कायम राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने धोनी, रैना आणि जाडेजा या तीन महत्वाच्या खेळाडूंना कायम राखण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. चेन्नई सुपरकिंग्ज व्यवस्थापनातील सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

या ३ खेळाडूंव्यतिरीक्त चेन्नई सुपरकिंग्ज भारताचा आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन आश्विनलाही आपल्या संघात कायम ठेवण्याचे प्रयत्न करणार आहे. ‘राईट टू मॅच’ कार्डाद्वारे आश्विनला संघात कायम ठेवण्याचे सुपरकिंग्ज प्रशासनाचे प्रयत्न असल्याचं समजतंय. आयपीएलची पहिली १० वर्ष पार पडल्यानंतर अकराव्या हंगामासाठी गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडूंना कायम राखण्यासाठी नवीन नियमावली तयार केली होती. यानूसार प्रत्येक संघमालकाला आपल्या संघातील ३ खेळाडूंना कायम राखण्याची मूभा देण्यात आली होती. याव्यतिरीक्त २ खेळाडूंना ‘राईट टू मॅच’ कार्डाद्वारे संघमालक आपल्याकडे कायम ठेऊ शकणार आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018 – गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सला रामराम करण्याच्या तयारीत?

आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ही शिक्षा पूर्ण करुन झाल्यानंतर दोनही संघ अकराव्या हंगामात पदार्पण करणार आहेत. २७ आणि २८ जानेवारी रोजी बंगळुरुत आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे या हंगामात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.