आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात, रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीदरम्यान ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो आठवा फलंदाज ठरला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर क्विंटन डी-कॉकच्या साथीने रोहित शर्माने मुंबईला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्याने २२ चेंडूत ३० धावा केल्या. या खेळीत ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यानच रोहितने ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

या कामगिरीसह रोहितने ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्युलम, कायरन पोलार्ड, शोएब मलिक, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना आणि विराट कोहली या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.