आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची सुरुवात अतिशय खराब झालेली आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अवघा एक विजय पदरात असलेला RCB चा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. विराट कोहली आणि काही खेळाडूंचा अपवाद वगळता एकही खेळाडू सध्या चांगल्या फॉर्मात नाहीये. मंगळवारी वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यातही RCB ला मुंबईने ५ गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर विराट आणि अनुष्काने आपल्या सहकाऱ्यांसाठी मुंबईतल्या घरात डिनर पार्टी आयोजित केली होती.

फिरकीपटू युजवेंद्र चहलने या डीनर पार्टीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

चहलसोबतच नवोदीत हिम्मत सिंह, कुलवंत खेजरोलिया, देव पडीक्कल यांनीही आपल्या आवडत्या जोडीसोबत फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. सध्याच्या घडीला RCB च्या संघाची कामगिरी पाहता, बाद फेरीत पोहचण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये विराटचा RCB संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.