IPL 2020चं विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकलं. या हंगामात कोलकाताने पाचव्या स्थानी स्पर्धा संपवली. कोलकाताच्या संघाचे नेतृत्व सुरूवातीला दिनेश कार्तिकने केलं होते. पण काही सामन्यांनंतर मात्र कार्तिकच्या जागी इयॉन मॉर्गनने ही जबाबदारी स्वीकारली. कर्णधारपदाचा भार आणि फलंदाजी अशी दुहेरी जबाबादारी कार्तिकला शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली. कोलकाताचा संघ अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत झुंज देत होता, पण अखेर त्यांना प्ले-ऑफ्स फेरी गाठण्यात अपयश आले. आता IPL 2021 लिलावाच्या आधी संघाने काही खेळाडूंना संघात कायम राखले आहे. त्यापैकी एका खेळाडूबद्दल माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आक्षेप नोंदवला आहे.

IPL 2021: KKRने ‘या’ ५ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

“कोलकाताच्या संघाने येत्या हंगामासाठी फिरकीपटू कुलदीप यादवला संघात कायम ठेवण्याचा निर्णय खूपच अनाकलनीय आहे. कुलदीपला संघात असताना फारशी संधी दिली गेली नाही. अशा परिस्थितीत त्याला संघातून करारमुक्त करायला हवं होतं. त्यामुळे कदाचित दुसऱ्या संघात तरी त्याला खेळायची आणि स्वत:ला सिद्ध करायची संधी मिळाली असती. जर तुम्ही भारतीय संघातून खेळत असाल पण तुम्हाला तुमच्या फ्रँचाईसीकडून खेळायची संधी मिळत नसेल तर हे तुमच्या कारकिर्दीसाठी खूपच मारक असते”, असं मत गंभीरने व्यक्त केले.

IPL 2021: KKRने ट्विटरवर उडवली CSKची खिल्ली, पाहा नक्की काय घडलं…

“कुलदीपला कोलकाताने संघात कायम राखले आहे. अशा वेळी त्यांनी कुलदीपला खेळायची संधी द्यायला हवी. आणि तसं होत नसेल तर स्वत: कुलदीपने पुढाकार घेऊन संघ व्यवस्थापनाला विनंती करावी की मला संघातून करारमुक्त करा आणि दुसऱ्या संघातून खेळू द्या. कारण जर कुलदीप यादव लिलावासाठी आला असता तर त्याच्या नक्कीच महागडी बोली लागली असती”, असा विश्वासदेखील गंभीरने व्यक्त केला.