विशाखापट्टणम येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाने तिसऱया दिवसाच्या अखेरीस २९८ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱया दिवसाच्या खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद ९८ अशी आहे. विराट कोहली ५५ धावांवर, तर रहाणे १९ धावांवर नाबाद आहे. फिरकीपटू अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तिसऱया दिवसाच्या दुसऱया सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५५ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारतीय संघाला २०० धावांची भक्कम आघाडी घेता आली. आर.अश्विनने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले. शमी, जडेजा, उमेश यादव, जयंत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दोनशे धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱया डावाची सुरूवात काहीशी निराशाजनक झाली. दमदार फॉर्मात असलेला मुरली विजय स्वस्तात माघारी परतला. इंग्लंडल्या स्टुअर्ट ब्रॉडने संघाला पहिले यश मिळवून दिले. मुरली विजयपाठोपाठ स्टुअर्ट ब्रॉडने के.एल राहुल यालाही तंबूत धाडले. चेतेश्वर पुजारा यावेळी अँडरसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. संघाचे तीन महत्त्वाचे फलंदाज अवघ्या ३० धावांमध्ये माघारी परतल्यामुळे भारतीय संघावर दबाव निर्माण करण्यात इंग्लंडला यश आले होते. पण विराट कोहलीने पुन्हा एकदा कर्णधारी कसब दाखवून मैदानात टीच्चून फलंदाजी केली आणि अर्धशतकी खेळी साकारली. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली ५५ धावांवर नाबाद राहीला, तर रहाणे कोहलीला साजेशी साथ देऊन १९ धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी, तिसऱया दिवसाच्या उपहारापर्यंत ६ बाद १९१ अशी धावसंख्या असणाऱया इंग्लंडच्या संघाचा संपूर्ण डाव दुसऱया सत्रात संपुष्टात आला. इंग्लंडचे २३४ धावांवर ८ गडी तंबूत परतले. तिसऱया दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी संयमी फलंदाजी करत आपापले अर्धशतक गाठले. दोघांनीही शतकी भागीदारी रचल्यामुळे इंग्लंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. बेअरस्टो-स्टोक्स जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना उमेश यादवने आपल्या भेदक माऱयाने बेअरस्टोला त्रिफळाचीत केले. बेअरस्टोने ५३ धावा केल्या. दुसऱया सत्रात अश्विनने भारतीय संघाला सातवे यश मिळवून दिले. अश्विनच्या फिरकीवर बेन स्टोक्स ७० धावांवर माघारी परतला, तर जडेजाने अन्सारीला स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने सामन्याच्या १०३ व्या षटकात आपल्या अफलातून फिरकीवर स्टुअर्ट ब्रॉडला पायचीत केले आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर अँडरसन याला शून्यावर माघारी धाडून इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. दुसऱया दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत दाखल झाले होते. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडची दाणादाण उडवत दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले आहे. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था ५ बाद १०३ अशी आहे. इंग्लंडचा संघ अजूनही ३५२ धावांनी पिछाडीवर आहे. आर.अश्विनने आपल्या फिरकी जादूने इंग्लंडच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले, तर जयंत यादव व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिवसाच्या अखेरीस भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे. Cricket Score, India vs England- दिवसभरातील अपडेट्स