थॉमस आणि उबेर चषकासाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सज्ज झाली आहे. संघाचा आत्मविश्वास उंचावण्याची जबाबदारी माझ्यावर असून एकेरीतील पहिल्याच सामन्यात मी मिळवलेल्या विजयानंतर संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल, असे सायनाने सांगितले.
उबेर चषकाच्या एकेरीतील पहिल्या सामन्यात  सायना तर दुसऱ्या सामन्यात पी. व्ही. सिंधू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याविषयी सायना म्हणाली, ‘‘कोणत्याही परिस्थितीत सुरुवात महत्त्वाची असते. एकेरीच्या पहिल्या सामन्यातील निकालाचा प्रभाव लढतीवर राहणार आहे. त्यामुळे मी माझ्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे.’’