वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय क्रिकेट संघाला आता इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताला त्यांच्यातील कमतरता दूर करण्याची वेळ आली आहे. भारतीय संघ सध्या २० दिवसाच्या ब्रेकवर आहे. १४ जुलैला ते पुन्हा नॉटिंगहॅममध्ये एकत्र येणार आहेत. या दरम्यान भारतीय खेळाडू प्रवासासह यूरो चषक पाहण्याचा विचार करत आहेत. इंग्लंड दौऱ्याचा विचार करायचा झाला, तर भारतीय संघाचा इतिहास वाईट आहे. २००७मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. पण त्यानंतर २०११, २०१४ आणि २०१८मध्ये भारताला पराभवच पाहावा लागला. यावेळेस भारताला इतिहास बदलण्याची गरज आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला काही सल्ले दिले आहेत. काय म्हणाले गावसकर? चार ऑगस्टपासून सुरू होणार्या इंग्लंड मालिकेपूर्वी भारतीय संघ मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल यांच्या फॉर्मची चाचणी घेऊ शकेल. गेल्या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया मालिकेपासून भारत रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही भारताची कसोटीतील सलामी जोडी आहे. २१ वर्षीय गिलची तांत्रिक कमतरता फलंदाजासाठी एक समस्या बनत आहे, असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला. त्यांनी स्पोर्ट्स तकला सांगितले, ‘‘मयंक अग्रवालने भारतासाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे, त्याने सलामीमध्ये दोनदा शतक ठोकले आहे. इंग्लंड कसोटीपूर्वी बीसीसीआय आणि जय शाह यांनी काही सराव सामने निश्चित केले आहेत. या सामन्यांद्वारे दोघांची परख होऊ शकते. शुबमन आणि मयंकला सलामीला पाठवले गेले पाहिजे, कारण रोहित शर्माला नक्की विश्रांती दिली जाईल. त्यानंतरच मयंक किंवा शुभमन यांपैकी कोण खेळेल हे ठरेल.'' हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिक : सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला तामिळनाडू सरकारकडून मिळणार ३ कोटी! ‘‘शुबमन गिलचे फुटवर्क फारसे चांगले नाही. इंग्लंडमध्ये आणि अगदी भारतातही तो क्रिजच्या पुढे असतो. आखूड टप्प्याचा चेंडू खेळताना बॅकफूटवर येणे कठीण आहे, म्हणूनच त्याने त्याच्या कौशल्यावर कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे'', असेही गावसकरांनी सांगितले.