२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पहिला सामना खेळताना दक्षिण आफ्रिकेवर मात केली. ६ गडी राखून भारताने पहिला सामना जिंकला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात नाबाद शतकी खेळी. भारताचा दुसरा सामना रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र या सामन्याआधी होणाऱ्या सरावसत्रावर पाणी फिरलं आहे.

लंडनमधील ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे टीम इंडिया मैदानात येऊन सराव करु शकली नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधीही पाऊस पडल्यामुळे भारताचं सरावसत्र रद्द करण्यात आलं होतं. या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यातही पावसाचा फटका बसला होता. तसेच श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला सामनाही पाऊस पडल्यामुळे रद्द करण्यात आला होता.