सव्वापाचशे धावसंख्येचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धास्त होता. एवढय़ा मोठय़ा धावसंख्येच्या बळावर भारतीय फलंदाजांना दोनदा गुंडाळता येईल, अशी ऑस्ट्रेलियाला खात्री होती. परंतु विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी ती खोटी ठरवली. या जोडगोळीने दिमाखदार शतके झळकावली आणि चौथ्या विकेटसाठी विक्रमी २६२ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे कांगारूंचे डोंगराएवढे आव्हानसुद्धा खुजे वाटू लागले होते. परंतु उत्तरार्धात भारताची तळाची फळी कोसळली आणि तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने किंचित वरचष्मा मिळवला.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ५३० धावसंख्येला प्रत्युत्तर देताना शनिवारी १ बाद १०८ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने आपले नाबाद फलंदाज सकाळी लवकर गमावले, पण विराट कोहलीने (१६९) ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसरे शतक झळकावले आणि रहाणेनेही (१४७) तितक्याचे त्वेषाने फलंदाजी करीत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील भारताकडून सर्वोच्च भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने ८ बाद ४६२ अशी मजल मारली असून, अद्याप ६८ धावांनी ते पिछाडीवर आहेत.ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेल्या पाच झेलांचा भारताला फायदा झाला, परंतु नवा चेंडू खुबीने वापरणाऱ्या रयान हॅरिसने पुनरागमन झोकात साजरे करताना ६९ धावांत ४ बळी घेतले. वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन (१/१३३) आणि कोहली यांच्या वाक्युद्धाने दिवसभर चांगलीच रंगत आणली. कोहलीने मारलेला चेंडू अडवल्यानंतर तो परत यष्टीरक्षकाकडे यष्टिचीत करण्यासाठी फेकण्याच्या प्रयत्नात तो कोहलीच्या अंगावर त्याने टाकला. त्यामुळे कोहली भडकला आणि या वादाची ठिणगी पडली. मग बळी मिळवण्यासाठी झगडणाऱ्या जॉन्सनला कोहलीने चौफेर चोप दिला. पण दिवसातील अखेरच्या षटकात द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या कोहलीचा जॉन्सननेच बळी मिळवला. यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने त्याचा सुरेख झेल टिपला.कोहली ८८ धावांवर असताना शेन वॉटसनने पहिल्या स्लिपमध्ये त्याला जीवदान दिले. या जीवदानाचा कोहलीने अचूक फायदा उचलत नववे शतक साकारले. सावधता आणि आक्रमकता यांचे योग्य मिश्रण असलेली ही खेळी कोहलीने २७२ चेंडूंत १८ चौकारांनिशी उभारली.रहाणेने फक्त १२७ चेंडूंत आपले शतक साजरे केले. तीन तास १० मिनिटे खेळपट्टीवर तग धरणाऱ्या रहाणेने २१ चौकार मारले. नॅथन लिऑनच्या फसव्या चेंडूवर रहाणे पायचीत झाला आणि जोडी फुटली.रहाणेचा बळी मिळवल्यानंतर यजमानांनी भारतीय फलंदाजीवरील पकड घट्ट केली. खेळाच्या अखेरच्या सत्रात भारताचे पाच फलंदाज फक्त ५३ धावांत गमावले. पदार्पणवीर लोकेश राहुलला मिड विकेटला जीवदान मिळाले, तरीही जेमतेम ३ धावांवर तो तंबूत परतला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हॅरिसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक हॅडिनने झेल टिपला. मग आर. अश्विन फक्त चार चेंडू मैदानावर टिकला, पण भोपळासुद्धा फोडू शकला नाही.धावफलक ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५३०भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. मार्श गो. वॉटसन ६८, शिखर धवन झे. स्मिथ गो. हॅरिस २८, चेतेश्वर पुजारा झे. हॅडिन गो. हॅरिस २५, विराट कोहली झे. हॅडिन गो. जॉन्सन १६९, अजिंक्य रहाणे पायचीत गो. लिऑन १४७, लोकेश राहुल झे. हेझलवूड गो. लिऑन ३, महेंद्रसिंग धोनी झे. हॅडिन गो. हॅरिस ११, रवीचंद्रन अश्विन झे आणि गो. हॅरिस ०, मोहम्मद शमी खेळत आहे ९, अवांतर (लेगबाइज १, वाइड १) २, एकूण १२६.२ षटकांत ८ बाद ४६२ बाद क्रम : १-५५, २-१०८, ३-१४७, ४-४०९, ५-४१५, ६-४३०, ७-४३४, ८-४६२गोलंदाजी : मिचेल जॉन्सन २९.२-५-१३३-१, रयान हॅरिस २५-७-६९-४, जोश हेझलवूड २५-६-७५-०, शेन वॉटसन १६-३-६५-१, नॅथन लिऑन २९-३-१०८-२, स्टिव्हन स्मिथ २-०-११-०आमचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे झाले. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी सुरेख फलंदाजी केली. आम्ही झेल टिपले असते तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. पहिल्या सत्रात आम्ही चांगली गोलंदाजी केली, मात्र दुसऱ्या सत्रात विराट-अजिंक्य जोडीने शानदार खेळ केला. कसोटी क्रिकेट रंजक नाही म्हणणाऱ्यांनी रविवारचा खेळ पाहायला हवा. दिवसाच्या शेवटी कोहली बाद झाल्याने सामन्याचे पारडे आमच्याकडे झुकले आहे. सोमवारी पहिल्या सत्रात झटपट बळी मिळवत भारताचा डाव गुंडाळून त्यानंतर मोठी आघाडी मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मैदानावर शाब्दिक चकमकी सुरू होत्या. मात्र त्या मैदानावरच सोडून देणे उचित ठरेल. विराटप्रती माझ्यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाला आदर आहे. त्याने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिले आहे. मात्र तरीही आम्हाला उद्देशून त्याला आणखी काही म्हणायचे असेल तर त्याने पुनर्विचार करावा. - रयान हॅरिस, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज