रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये मोठा विक्रम नोंदवला आहे. आयपीएल 2021च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध खेळताना विराटने ही कामगिरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा जो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.

 

आयपीएल 2021च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध विराटने 29 चेंडूत 33 धावा केल्या. टी-20 क्रिकेटच्या 305 सामन्यांच्या 290 डावात त्याने आता 9764 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 5 शतके आहेत. तर, 113 धावांची खेळी ही त्यांच्या टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी आहे.

टी-20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 252 टी-20 सामन्यांत कर्णधार म्हणून 5872 धावा केल्या आहेत. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर गौतम गंभीर (166 डावात 4242 धावा), आरोन फिंच चौथ्या (126 डावात 4051 धावा) आणि पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा (140 डावात 3929 धावा) आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर येथेसुद्धा कर्णधार म्हणून धावा काढण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने 45 सामन्यात 1502 धावा केल्या आहेत.

आयपीएल2021 चा पहिला सामना

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने बंगळुरूसमोर 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बंगळुरू संघाने 8 गडी गमावले खरे, पण सामना खिशात टाकला. ग्लेन मॅक्सवेलने 39, विराट कोहलीने 33 आणि एबी डिव्हिलियर्सने 48 धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. तर, वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने 27 धावांत 5 बळी घेत बंगळुरूच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.