Virat Kohli Fan Viral Video: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. विराटने १२ मे ला इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. विराटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याला पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या. तर विराटने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विराटने आणखी काही वर्ष भारतीय संघासाठी खेळायला हवं होतं, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती. दरम्यान आता सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
कसोटी क्रिकेटला रामराम करण्याच्या काही मिनिटांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा विमानतळावर स्पॉट झाले होते. त्यानंतर अवघ्या मिनिटात विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. हा व्हिडीओ व्हायरल होताच, क्रिकेट चाहत्यांना वाटलं विराट कोहली लंडनला निघून गेला. मात्र, त्यानंतर या दोघांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. ज्यात दोघेही वृंदावनातील प्रेमानंदजी महाराजांची भेट घेताना दिसून आले. यावरून हे स्पष्ट झालं की, विराट लंडनला गेलेला नाही.
आम्ही आता कसोटी क्रिकेट पाहणं बंद करू
वृंदावनातून परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी दोघांनाही पॅपाराझींनी घेरलं. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक चाहता त्याला, विराट सर तुम्ही चुकीचं केलं असं म्हणताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चाहता विराटला म्हणतो, “विराट सर तुम्ही चुकीचं केलं, तुम्ही निवृत्ती का घेतली? आता आम्ही कसोटी क्रिकेट पाहणं सोडून देऊ. तुम्ही होते म्हणून मी कसोटी क्रिकेट पाहत होतो.” विराट यावर उत्तर देऊ इच्छितो, पण त्यानंतर तो उत्तर देणं टाळतो.
पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा
विराटने १२ मे रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भावूक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ” टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या प्रारुपाने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली.”
तसेच त्याने पुढे लिहिले की, “टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”