भारतीय क्रिकेट संघ १८ नोव्हेंबरपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या, तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (शुक्रवार) खेळला जाणार आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसह अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित आणि राहुल हे टीम इंडियाचे नियमित सलामीवीर आहेत. आता प्रश्न येतो की त्यांच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शुभमन गिलसोबत कोण सलामी देईल? भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने या विषयावर आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की, युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने शुभमन गिलसोबत न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध सलामी दिली पाहिजे. कारण मध्यम आणि खालच्या फळी आधीच सेट आहेत.

ईएसपीएन क्रिकइन्फोला बोलताना वसीम जाफर म्हणाला की,“माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतसह शुभमन गिल सलामीवीर असेल. पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल की नाही हे मला माहीत नाही. कारण माझ्याकडे श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर, सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर, कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर आहे. हा क्रम पाहता पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल असे वाटत नाही. त्यामुळे मला वाटते की त्याच्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे क्रमवारीत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणे.”

हेही वाचा – IND vs NZ T20 Series: हार्दिकपासून ते उमरान मलिकपर्यंत, न्यूझीलंडमध्ये ‘या’ युवा खेळाडूंवर असणार नजर

वसीम जाफर पुढे म्हाणाला, दीपक हुडा सहाव्या क्रमांकावर, वॉशिंग्टन सुंदर सातव्या क्रमांकावर आणि हर्षल पटेल आठव्या क्रमांकावर खेळतील. नवव्या क्रमांकावर, तुम्ही कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहल यापैकी एकाची निवड करू शकता. मी कुलदीपला प्राधान्य देईन, पण तुम्ही त्यापैकी एकाची निवड करू शकता. मोहम्मद सिराज विश्वचषकापूर्वी खेळला होता, त्यामुळे तो पुढचे स्थान घेऊ शकेल आणि अर्शदीप सिंग हा ११वा खेळाडू असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी क्रिकेटपटूने पंतचे कौतुक करताना शेवटी सांगितले, की “ऋषभ पंत नेहमीच भारत आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. कधीकधी मला वाटते की सलामी ही त्याच्यासाठी क्रमांक असेल. कारण जेव्हा तो डावाच्या सुरुवातीला खेळतो, तेव्हा तो धोकादायक असतो. एकदा त्याने चांगली सुरुवात केली, आणि पॉवरप्लेमध्ये २०-२० धावा केल्या, तर तो खूप धोकादायक असतो, त्याला रोखणे कठीण होते.”