इंग्लंडविरुद्धच्या मालिका पराभवानंतर हताश झालेल्या कर्णधार कोहलीचे मत

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कडवी झुंज देऊनही पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अत्यंत निराश झाला आहे. फक्त स्पर्धा करून भागणार नाही, तर आम्हाला दडपणाच्या परिस्थितीत विजयी रेषा गाठण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया कोहलीने सोमवारी दिली.

साऊदम्पटन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २४५ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघाचा डाव १८४ धावांवर संपुष्टात आला. यामुळे, पाचव्या कसोटी सामन्यापूर्वीच मालिका भारताने मालिका ३-१ अशी गमावली आहे.

कोहली म्हणाला, ‘‘धावफलक पाहून आम्ही हे म्हणू शकतो की, आम्ही फक्त ४० ते ५० धावा दूर होतो. मात्र आम्हाला हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आम्ही त्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहोत. आम्हाला ठाउक आहे की आम्ही चांगला खेळ केला, पण तरीही प्रत्येक वेळी तुम्ही स्वत:च्या मनाला कडवी झुंज दिली असे नाही समजावू शकत.’’

‘‘जेव्हा तुम्ही विजयाच्या जवळ येता त्यावेळी ती विजयी रेषा ओलंडण्याची कला तुम्हाला अवगत असणे अत्यंक महत्त्वाचे आहे आणि याच कलेची भारतीय फलंदाजांमध्ये कमतरता जाणवत आहे. आमच्यात शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यात टिकून राहण्याची क्षमता आहे. मात्र दडपणाखाली कसे खेळावे, यावर काम करण्याची आवश्यकता आहे,’’ असे कोहली म्हणाला.

यावेळी कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या व इंग्लंडविरुद्धच्याही तिसऱ्या कसोटी सामन्याचे उदाहरण दिले. तो म्हणाला, ‘‘आफ्रिकेविरुद्ध आम्ही तिसऱ्या कसोटीत पहिले तीन दिवस पिछाडीवर असूनदेखील सामना जिंकला. तर नॉटिंगहॅममध्ये आम्ही तीन दिवस सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि चौथ्या दिवशीच जवळपास विजय पक्का केला.’’

याव्यतिरिक्त, मोईन अली हा एक चाणाक्ष फिरकीपटू असून त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी आम्हाला नवीन योजना तयार करावी लागणार आहे, असेही कोहलीने नमूद केले. चौथ्या कसोटीच्या दोन्हीं डावात मिळून मोईनने नऊ बळी घेतले तसेच सामनावीराचा पुरस्कारही मिळवला.

कोहलीचे अव्वल स्थान अबाधित

दुबई : विराट कोहलीने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत कोहलीने अनुक्रमे ४६ व ५८ धावा करत कारकीर्दीतील सर्वोच्च अशा ९३७ गुणांची कमाई केली. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजारानेही सहावे स्थान कायम राखताना ७६३ गुणांवरून ७९८ गुणांपर्यंत भरारी घेतली आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद शमीने १९व्या स्थानी धडक मारली आहे. तर जसप्रित बुमराने कारकीर्दीतील सर्वोच्च गुणांसह (४८७) ३७वा क्रमांक मिळवला. चौथ्या कसोटीचा सामनावीर मोईन अलीने ३३ वे स्थान मिळवले आहे.