माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने बाबर आणि पाकिस्तान संघावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर त्याने भारतासारख्या संघाकडून काही गोष्टी शिकण्याचा सल्ला दिला आहे. त्याने कर्णधार बाबर आझमला संघासाठी धावा करण्यास सुरुवात करण्यास सांगितले आहे. कनेरिया म्हणाला की, भारतीय संघ मॅच विनर्सने भरलेला आहे, पण पाकिस्तान तिन्ही फॉरमॅटमध्ये बाबर आझमवर खूप अवलंबून आहे. बाबर फक्त स्वतःसाठी धावा करतो. दानिश कनेरिया आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “जर तुम्ही या भारतीय संघाकडे पाहिले, तर तो मॅच विनर्सने भरलेला आहे. पण पाकिस्तान तिन्ही फॉरमॅटमध्ये बाबर आझमवर खूप अवलंबून आहे आणि तो फक्त स्वतःसाठी धावा करतो. बाबर आझम स्वत:साठी ५०-६० धावा करतो. त्याचा संघाला फायदा होत नाही आणि संघ फक्त हरतो. बाबर संघासाठी कधीही धावा करत नाही.'' दानिश कनेरिया पुढे म्हणाला, “आमच्याकडे शोएब अख्तरसारखा गोलंदाज नाही, ज्याच्याकडे कधीही विकेट घेण्याची क्षमता आहे. आमच्याकडे सईद अन्वर, आमिर सोहेल, इम्रान फरहत, तौफीक उमर आणि सलमान बटसारखे प्रभावी सलामीवीर नाहीत. आमची मिडल ऑर्डर मोहम्मद युसूफ, युनूस खान आणि इंझमाम-उल-हक सारख्या खेळाडूंनी भरलेली होती. अब्दुल रज्जाकच्या रुपाने आमच्याकडे एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये संघ आम्हाला घाबरत होते, परंतु आता तसे नाही.'' हेही वाचा - IND vs NZ 3rd ODI: सूर्यकुमार, वॉशिंगटन आणि कुलदीपने घेतले महाकालचे दर्शन; ऋषभसाठी केली प्रार्थना, पाहा फोटो दानिश कनेरियाने न्यूझीलंडविरुद्ध बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाच्या फलंदाजीच्या कामगिरीवर टीका केली. तो म्हणाला, “आम्ही एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या केली का? द्विशतक कोणी केले? एक तरी प्रभावी कामगिरी होती का? नाही. हे सर्व लक्षात घेऊन भारतासारख्या इतर देशांकडून शिकले पाहिजे. जे त्यांच्या घरच्या परिस्थितीचा फायदा घेत आहेत, परंतु येथे आपल्याला अनुकूल परिस्थितीत आपण उघडे पडण्याची भीती आहे.''