देशातील करोना स्थितीमुळे टी २० मुंबई लीग मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील आणि मुंबई प्रीमिअर लीगचे गव्हर्निंग कॉन्सिल अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत मुंबई लीग मालिका पुढे ढकलत असल्याचं पत्रक त्यांनी जारी केलं आहे.

‘देशातील सध्याची करोना स्थिती पाहता सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट लीगचं ३ रं पर्व पुढे ढकलत आहोत. पुढचा निर्णय येईपर्यंत हा आदेश लागू राहील’, असं ट्विट केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तर आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण आणि सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं मिलिंद नार्वेकर यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई लीग गव्हर्निंग कॉन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रं मिलिंद नार्वेकर यांच्याकडे डिसेंबर २०२० पासून आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच या मालिकेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र सथ्याची करोना स्थिती पाहता ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.