Sarfaraz Nawaz Big Statement About Team India: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया चषक २०२३ स्पर्धेत सहभागी होईल. आशिया चषकानंतर विश्वचषक खेळवला जाणार आहे. मात्र भारताला अद्याप आपला निश्चित संघ बनवता आलेला नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनेक खेळाडूंना आजमावले आहे. मात्र अद्याप निश्चित संघ तयार झालेला नाही. यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सरफराज नवाजने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सरफराज नवाज म्हणाला, भारत आपला संघ तयार करण्याऐवजी उद्ध्वस्त करत आहे. इंडिया टुडेवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, तो म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी भारतापेक्षा जास्त तयार आहे. भारतीय संघ अजूनही अंतिम संयोजन करण्यात व्यस्त आहे.”
भारत आपला संघ तयार करण्याऐवजी उद्ध्वस्त करतोय –
सरफराज नवाज म्हणाला, “कर्णधार बदलले आहेत. अनेक खेळाडूंना आजमावून पाहिले गेले. पण तरीही निश्चित संघ तयार होऊ शकला नाही. मला वाटतं भारत आपला संघ तयार करण्याऐवजी उद्ध्वस्त करत आहे. यामुळे दबाव वाढतो. भारताबाबत चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे चांगली कामगिरी करणारे वरिष्ठ खेळाडू आहेत.”
हेही वाचा – SOM vs SUS: चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये चमकला; शानदार शतक झळकावत दिले परतीचे संकेत
विशेष म्हणजे टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. यानंतर वनडे मालिका आणि आता टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेपूर्वी भारताने अनेक खेळाडूंना आजमावले. तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नवीन खेळाडूंना संधी दिली. मात्र आशिया चषकासाठी संघ अद्याप निश्चित झालेला नाही. हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा वनडे आणि टेस्टमध्ये कर्णधार आहे.
हेही वाचा – विराट कोहलीने चाहत्याला दिला पुढच्या वेळी सेल्फी देण्याचा शब्द, VIDEO होतोय व्हायरल
कोण आहे सर्फराज नवाज?
७४ वर्षीय सरफराज नवाज हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज राहिला आहे. तो १९६९ ते १९८४ पर्यंत तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला. यादरम्यान त्याने पाकिस्तानसाठी ५५ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत ११७ तर एकदिवसीय सामन्यात ६३ विकेट्स आहेत. मात्र, त्याच्या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची हवा काढून भारतीय संघच सांगेल.