टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताला पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड विरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या पराभवामुळे काहीजण खूप निराश झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्याने विराट कोहलीला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगितले आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ”असे नाही की कोहली सध्या दडपणाखाली कामगिरी करू शकत नाही, पण हो तो आवश्यक सामन्यात कामगिरी करू शकत नाही. बाद फेरीसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये त्याला धावा करता येत नाहीत. त्यामागचे कारण हे आहे की ते आता मानसिकदृष्ट्या इतके मजबूत नाहीत.”

याशिवाय रोहित शर्माला सलामीला न पाठवण्याबाबत तो म्हणाला, ”रोहित शर्माला ओपनिंगला न पाठवण्याचा निर्णय चुकीचा होता. रोहितसारखा अनुभवी फलंदाज तुम्हाला पहिल्या 6 षटकांमध्ये झटपट सुरुवात देऊ शकत नसेल, तर पहिल्यांदाच विश्वचषक खेळत असलेल्या इशानसाठी हे खूप कठीण होते. निर्धाव चेंडुंमुळे फलंदाजांवर दडपण होते. त्यांनी एकेरी घेत राहिल्या असत्या आणि स्ट्राईक बदलले असते तर त्याच्यावर मोठे फटके खेळण्याचे दडपण आले नसते. तसेच ते इतके वाईट शॉट खेळून बाद झाले नसते.”

हेही वाचा – T20 WC : न्यूझीलंडपुढं टीम इंडियाची नाचक्की; शोएब अख्तर म्हणतो, ‘‘मला माहीत होतं, की…”

गोलंदाजीबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, “वरूण एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि न्यूझीलंडने त्याला जास्त खेळलेले नाही. अशा स्थितीत तो मोठा धोका ठरू शकतो, पण बोर्डावर अधिक धावा असणे आवश्यक होते. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे. बुमराह वगळता कोणीही लयीत गोलंदाजी केली नाही. शार्दुल ठाकूरही तसा गोलंदाज दिसत नव्हता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे सुपर-१२ मध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण झाला आहे. भारताच्या गटात पाकिस्तान सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तानही जबरदस्त खेळ दाखवत आहे. न्यूझीलंड तिसऱ्या आणि नामिबिया चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानावर असलेल्या भारत आणि सहाव्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडला अद्याप आपले खाते उघडता आलेले नाही.