Gautam Gambhir on Shubman Gill Captaincy IND vs ENG: भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिलला त्याच्या कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या हातातून इंग्लंडने विजय हिसकावून घेतला आणि अखेरीस संघावर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. गंभीरने गिलच्या पहिल्या सामन्यानंतर त्याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय भारतासाठी एका नवीन युगाची सुरुवात झाली, गिल भारताचा सर्वात तरुण कसोटी कर्णधार ठरला. पण त्याच्या नेतृत्त्वातील पहिल्याच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोच गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्त्वाबद्दल भाष्य केलं आहे. गंभीरने गिलची बाजू घेत तो म्हणाला, “पहिला कसोटी सामना होता, त्यामुळे साहजिकचं नव्हर्स तर असणारच. ही त्याच्यासाठीही एक सन्मानाची गोष्ट होती. त्याने आधीच म्हटल्याप्रमाणे, कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते आणि त्याने ही जबाबदारी चांगली पार पाडली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, पहिल्या डावात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. साहजिकच की तो कर्णधार असलेल्या पहिल्याच सामन्यात खेळताना शतक करत आहे, तेव्हाही तो नर्व्हस झाला असणार.”
गंभीर पुढे म्हणाला, “म्हणून एक यशस्वी कर्णधार होण्यासाठी आपल्याला फक्त त्याला वेळ द्यावा लागेल. आपण अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि तो पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व करत आहे. मला खात्री आहे की तो आणखी चांगली कामगिरी करेल आणि कर्णधारपदासाठी हे कठिण ठिकाण आहे. हे एखाद्याला खोल समुद्रात ढकलण्यासारखं आहे आणि मला खात्री आहे की तो एक प्रोफेशनल म्हणून तयार होऊन येईल.”
शुबमन गिलने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावलं. याचबरोबर त्याने सेना देशांमध्ये पहिल्यांदाच त्याची सर्वाेच्च धावसंख्या नोंदवली. गिलने पहिल्या डावात २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकारासह १४७ धावा केल्या.