राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंग याचे नाव चर्चेत होते. पण हरभजनला यंदाच्या वर्षी हा पुरस्कार नक्कीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब सरकारने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याच्या नावाची शिफारस केली होती. मात्र हा अर्ज क्रीडा मंत्रालयाने फेलातून लावला आहे. महत्वाची बाब म्हणजे भारताची मान उंचावणाऱ्या स्टार धावपटू द्युती चंदलाही अर्जुन पुरस्कार नाकारण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी तिच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती, पण रँकिंगमध्ये मागे पडल्याने तिच्याही यंदाच्या वर्षातील पुरस्काराच्या आशा मावळल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या वर्षी खेल रत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस केलेली नाही. मात्र BCCI ने अर्जुन पुरस्कारासाठी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावांची शिफारस केली आहे. त्यामुळे खेळ रत्न पुरस्कारासाठी पंजाब सरकारने हरभजनच्या नावाची शिफारस केली होती. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल होती, पण हरभजनच्या नावाच्या शिफारशीचा अर्ज २५ जून रोजी क्रीडा मंत्रालयाला मिळाला. त्यामुळं तो रद्द करण्यात आला. क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंच्या नावांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कार समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची यादी अंतिम निर्णयासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पाठवण्यात येईल.
याशिवाय धावपटू द्युती चंदलाही अर्जुन पुरस्कार मिळणार नाही. एका क्रीडा महासंघाकडून अर्जुन पुरस्कारासाठी तीन नावे पाठवली जातात. एथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) द्युती आणि मनजीत याच्यासह तेजिंदर पाल सिंह तूर, स्वप्ना बर्मन, अरपिंदर सिंह यांचीही नावे पाठवली होती. ही नावे पाठवताना यादीत द्यूतीचे नाव पाचव्या क्रमांकावर होते. त्यामुळे त्यांच्याही पुरस्काराच्या आशा मावळल्या.