Harbhajan Singh’s Warning to Indian team : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दुहेरी धक्का बसला आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. या दोघांच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, हरभजन सिंग म्हणाला की, टीम इंडियाला जडेजा आणि केएल राहुलची उणीव भासेल कारण नवीन संघात अनुभवाची कमतरता आहे.

भारतीय फलंदाजी कमकुवत दिसत आहे –

हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. हे दोघे कधी परततील हे सध्या तरी माहीत नाही. विराट कोहली आधीच बाहेर आहे. तो असता तर भारतीय फलंदाजी त्याच्या उपस्थितीमुळे आणखी मजबूत झाली असती. शुबमन गिल फॉर्ममध्ये नाही आणि बऱ्याच दिवसापासून श्रेयसच्या बॅटमधून धावा होत नाहीत. अशा परिस्थितीत संघात अनुभवाची कमतरता आहे. होय, हे खरे आहे की रोहित शर्मा आहे. मात्र, दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आर अश्विन आहे. याचा अर्थ भारतीय फलंदाजी कमकुवत दिसत आहे.”

हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा –

हरभजन पुढे म्हणाला, “मला वाटते भारत दुसऱ्या कसोटीत टर्निंग ट्रॅकवर खेळेल. कारण सुंदर आणि सौरभ यांना संघात सामील केले आहे. संघात आर अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव आधीपासूनच आहेत. भारत टर्निंग ट्रॅक तयार करून ते स्वत:च्याच जाळ्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. भारतीय बॅटिंग युनिट तरुण आहे, त्यांना वेळ हवा आहे आणि जर त्यांना चांगली विकेट मिळाली तर ते चांगली कामगिरी करू शकतात.”

हेही वाचा – U19 WC 2024: मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, न्यूझीलंडसमोर ठेवले २९६ धावांचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.