Ravichandran Ashwin on 500 Test Wickets : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात रविचंद्रने अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉऊलीला बाद करत कसोटी क्रिकेटमधील ५०० विकेट्स पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा अश्विन हा भारताचा दुसरा आणि जगातील नववा गोलंदाज ठरला. सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने आपल्या या पराक्रमाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने आपली ५००वी विकेट वडिलांना समर्पित केली आहे.

“माझे वडील नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले”

रविचंद्रन अश्विनने १३ वर्षांच्या दीर्घ प्रवासानंतर कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी पूर्ण केले. सामन्यानंतर अश्विन म्हणाला, “हा खूप लांबचा प्रवास राहिला आहे. माझी ५००वी विकेट वडिलांना समर्पित करायची आहे. आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी माझे वडील नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. माझ्या वडिलांमुळेच मी आयुष्यात सर्व काही मिळवू शकलो. माझ्या वडिलांची प्रकृतीही खराब असून तरीही ते मला गोलंदाजी करताना नक्कीच पाहतात. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे.”

“आम्ही उद्या सकाळी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू”

इंग्लंडच्या डावाबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “५०० विकेट पूर्ण झाल्या आहेत. इंग्लंड ज्या प्रकारे खेळत आहे, तुम्हाला जास्त षटके टाकण्याची गरज नाही. इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळत आहे. आम्हाला विचार करण्याची संधी मिळत नाही. पण पुढे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जाईल, असे मला वाटते. पाचव्या दिवशी तर खूपच अवघड होणार आहे. खेळात समतोल असून सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. आम्ही सकाळी पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू. तसेच आम्हाला दबावातून बाहेर पडण्याची गरज आहे.”

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test: “लाखात एक गोलंदाज…”, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांकडून रविचंद्रन अश्विनचे कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात बेन डकेटच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ३४ षटकानंतर २ बाद २०७ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजून २३८ धावांनी पुढे आहे. सध्या इंग्लंडकडून बेन डकेट १३३ धावांवर नाबाद तर जो रूट नऊ धावांवर खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४४५ धावा केल्या.