Rohit Sharma praised Dhruv Jurel : रांची येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह संघाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. विजयानंतर त्याने यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलसह सर्व युवा खेळाडूंचे कौतुक केले.

“ही खूप कठीण मालिका होती” –

रांचीमधील विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “ही खूप कठीण मालिका होती. चार कसोटी सामन्यांनंतर शेवटी या स्थितीत येणे आमच्यासाठी चांगले होते. आमच्यासमोर अनेक आव्हाने आली, पण आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या खेळाडूंना इथेच राहायचे आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि स्थानिक क्लबमधून येथे येणे हे मोठे आव्हान आहे, पण मला त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. त्यांना हवे ते वातावरण आम्ही त्यांना दिले. त्यांना काय करायचे आहे याबद्दल ते स्पष्ट आहेत.”

जुरेलने फलंदाजीमध्ये संयम दाखवला”-

रोहित शर्मा पुढे ध्रुव जुरेलचे कौतुक करताना म्हणाला, “जुरेलने फलंदाजीमध्ये संयम दाखवला आणि चौफेर फटके मारले. पहिल्या डावातील त्याच्या ९० धावा अतिशय महत्त्वाच्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याची आणि गिलची भागीदारी महत्त्वाची होती. त्याने शुबमन गिलसह दबाव चांगला हाताळला.” ध्रुव जुरेल आणि शुबमन गिल यांनी नााबाद ७२ धावांची भागीदारी साकारत भारतीय संघाला सामना जिंकवून दिला. शुबमन ५२ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा – Hanuma Vihari : खळबळजनक! भारतीय क्रिकेटपटूला नेत्याच्या मुलावर ओरडणं पडलं महागात, द्यावा लागला राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने रांची कसोटीत भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या डावात भारताचा डाव सावरताना त्याने १४९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने संघासाठी ९० धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ७७ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. शुभमन गिलसोबतची त्याची भागीदारी महत्त्वाची होती, ज्यामुळे सामना भारतीय संघाच्या बाजूला झुकला.