IND vs ENG 1st Test Updates in Marathi: भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना फारच अटीतटीचा होत आहे. दोन्ही संघ एकमेकांना चुरशीची लढत देत आहेत. भारताने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात आतापर्यंत संघाने ३ विकेट्स गमावले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात भारत इंग्लंडला किती धावांची आघाडी देणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान एक अनोखा योगायोग समोर आला आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूने जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यात शतक केलं आहे, तो सामना भारताने जिंकला आहे.
चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडच्या गोलंदाजीला तोडीस तोड उत्तर देत फलंदाजी केली आहे. लंचब्रेकपर्यंत भारताने ३ विकेट्स गमावत १५३ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवशी आकाशात काळे ढग जमा झाले आहेत, त्यामुळे पावसामुळे कधीही सामना थांबण्याची शक्यता आहे.
लीड्स कसोटी सामन्यात दोन्ही संघ बरोबरीच्या स्थानावर असले तरी भारताला एका योगायोगामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. भारतीय खेळाडूने जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यात शतक केलं आहे, तेव्हा भारतीय संघाने सामना जिंकला आहे, म्हणजेच त्याचे शतक विजयाची हमी मानलं जाऊ शकतं.
टीम इंडियाच्या खेळाडूचं शतक अन् भारताचा कसोटी विजय, अनोखं समीकरण
भारतीय संघाकडून पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या फलंदाजांनी शतकं झळकावली आहेत. पण आपल्या शतकासह विजयाची हमी देणारा क्रिकेट यशस्वी जैस्वाल आहे. यशस्वीने नुकतीच आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली आहे. परंतु यादरम्यानही त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत ५ कसोटी शतकं झळकावली आहेत आणि प्रत्येक वेळी भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
जैस्वालने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा त्याने पहिल्याच सामन्यात १७१ धावांची शानदार खेळी केली होती. टीम इंडियाने तो सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. २०२४ मध्ये जैस्वालने इंग्लंडविरुद्ध दुसरे कसोटी शतक झळकावले. शतक नव्हे खरंतर ते त्याचं पहिलं द्विशतक होतं, त्याने २०९ धावांची खेळी खेळली होती. भारताने तो सामना १०६ धावांनी जिंकला.
यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या पुढच्या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा केल्या. टीम इंडियाने हा सामनाही ४३४ धावांनी जिंकला. यशस्वी जैस्वालने नोव्हेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या. टीम इंडियाने हा सामना २९५ धावांनी जिंकला होता. पण यानंतर संपूर्ण सामन्यात जैस्वालने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही आणि भारताने यानंतर मालिकेतील एकही सामना जिंकला नव्हता.
यशस्वीने आता इंग्लंड दौऱ्यावर देखील पहिल्याच सामन्यात शतक केलं आहे. जैस्वालने १५९ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावांची खेळी केली. आता त्याच्या या शतकी खेळीनंतर भारताच्या विजयाचा सिलसिला कायम राहणार की खंड पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.