राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेतील निर्णायक सामन्यात टीम इंडियाने ९१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्याने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली. अक्षर पटेलने या मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले. त्याची 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून निवड झाली. विजयानंतर अक्षर पटेलने कर्णधार हार्दिक पंड्याचे कौतुक केले. पंड्याने कशी मदत केली ते सांगितले. अक्षर पटेलने कर्णधार हार्दिकला यशाचे श्रेय दिले अक्षर पटेलने आपल्या फलंदाजीबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “माझी फलंदाजी संघासाठी उपयुक्त ठरते तेव्हा मला त्याचा अधिक आनंद होतो. या मालिकेत मी काही वेगळे केले नाही. मला माझ्या कर्णधाराकडून (हार्दिक पांड्या) आत्मविश्वास मिळाला. तो मला म्हणाला, तू फक्त मोकळेपणाने खेळ.” पुढे अक्षर म्हणाला की, “ जर सामन्यात काही वेगळं घडलं मी फटके मारण्याच्या नादात किंवा विकेट घेताना जर अधिक धावा दिल्या किंवा लवकर बाद झालो तर तो मला सांभाळून घेईल. अशी त्याने मला ग्वाही दिली आहे. आम्ही टीम मीटिंगमध्ये खूप योजना बनवतो, पण कधी कधी सगळंच चुकतं. मी फक्त माझ्या गुणांवर आणि खेळीवर लक्ष केंद्रित करतो.” पुढे अक्षर पटेल सूर्यकुमार विषयी म्हणाला की, “मी सूर्याभाईशी बोललो, त्याने मला सांगितले की आम्ही आक्रमक फटके मारत राहिले पाहिजे जेणेकरून मोमेंटम जायला नको. सामना शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. त्याच्या या रणनीतीमुळे आम्ही २०० धावांचा टप्पा ओलाडून पुढे जाऊ शकलो.” https://twitter.com/StarSportsIndia/status/1611954832327467008?s=20&t=JuLFOjoGdvi9shwKdZHk2Q रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल हा गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा खेळाडू म्हणून टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याला टी२० विश्वचषकातही स्थान देण्यात आले होते, पण तिथे तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पण भारतीय भूमीत येताच त्याची खेळी आणखी उंचावते आणि तो अधिक घातक अष्टपैलू खेळाडू ठरतो. या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अक्षर पटेल तिसऱ्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो चौथ्या स्थानावर होता. त्याने ३ सामन्यात एकूण ११७ धावा केल्या. यासोबतच ३ बळीही घेतले. त्याने दमदार फलंदाजी करताना अर्धशतकही झळकावले. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात अक्षरने अप्रतिम फलंदाजी केली. यानंतर त्याचे खूप कौतुक झाले. हेही वाचा: Suryakumar Century: “भाऊ बहुत सारा प्यार…” किंग कोहलीच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारने दिला गोड रिप्लाय, Video व्हायरल विशेष म्हणजे राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या. यादरम्यान अक्षर पटेल २१ धावा करून नाबाद राहिला. त्याने ९ चेंडूंचा सामना करत ४ चौकार मारले. सूर्यकुमार यादवने संस्मरणीय शतक झळकावले. त्याने ५१ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला श्रीलंकेचा संघ १३७ धावांवर सर्वबाद झाला.