IND vs SL, Asia Cup 2023: आशिया कप अंतिम सामन्यात, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एकदिवसीय फॉर्मेटमध्ये एकाच षटकात चार विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात सिराजने पहिल्या तीन षटकात श्रीलंकेच्या ५ विकेट्स घेतल्या घेतले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सिराजच्या घातक गोलंदाजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोएबने त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केले आणि लिहिले, “(ये तो तबाही, विनाश हे) ही श्रीलंकेची दाणादाण आणि सर्वनाश आहे.” सिराजने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात घातक वेगवान गोलंदाजी केली. जगातील सर्वात वेगवान गोलंदाज मानल्या जाणाऱ्या अख्तरचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, त्याने त्याच्या युट्युब चॅनेलवर प्रतिक्रिया देखील दिली आहे.

शोएब अख्तर म्हणाला, “ भारतीय संघ आगामी वर्ल्डकपसाठी संपूर्णपणे तयार आहे. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असे सगळे बॉक्स टिक केले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पराभवाचा बदला त्यांनी श्रीलंकेविरुद्ध घेतला. मोहम्मद सिराजने त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. त्यामुळे यावर्षीचा विश्वचषक २०२३ हा भारतात होणार असल्याने सर्व संघ आताच्या त्यांच्या या कामगिरीमुळे सतर्क झाले असतील. त्यांच्याकडे सर्व संघापेक्षा ताकदवान अशा स्वरुपाची गोलंदाजी आहे. तसेच, उत्तम दर्जाचे असे फिरकीपटू आहेत. मिडल ऑर्डरची जी समस्या होती ती सुद्धा आता के.एल. राहुलमुळे मिटली आहे. त्यामुळे भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा!”

मोहम्मद सिराजच्या (२१/६) घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून विक्रमी आठव्यांदा आशिया चषक विजेतेपद पटकावले. श्रीलंकेला १५.२ षटकांत अवघ्या ५० धावांत गुंडाळल्यानंतर भारताने ६.१ षटकांत १० गडी राखून सामना जिंकला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो मोहम्मद सिराज, ज्याने अवघ्या १६ चेंडूत ५ विकेट्स आणि ७ षटकांत २१ धावांत ६ विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आशिया कप फायनलमध्ये भारताचा श्रीलंकेवर १० गडी राखून दणदणीत विजय आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीने या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले.

आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १५.२ षटकांत सर्वबाद ५० धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने ७ षटकांत २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पांड्याने २.२ षटकांत ३ धावांत ३ विकेट्स, बुमराहने २३ धावांत एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ आणि दुशान हेमंताने १३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ६.१ षटकात एकही विकेट न गमावता ५१ धावा केल्या आणि १० विकेट्स राखून विजय मिळवला. शुबमन गिल २७ आणि इशान किशन २३ धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा: IND vs SL, Asia Cup: सिराज फॉर्मात, चाहते कोमात! श्रीलंकेच्या पराभवानंतर फॅन्सना अश्रू अनावर, पाहा Video

भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया कप जिंकला

या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. यापैकी भारताने ७ वेळा एकदिवसीय विजेतेपद (१९८४, १९८८, १९९०, १९९५, २०१०, २०१८, २०२३) आणि एकदा (२०१६) टी२० आशिया चषक विजेतेपद पटकावले आहे. भारतानंतर, श्रीलंकेने सर्वाधिक आशिया चषक (६) (१९८६, १९९७, २००४, २००८, २०१४, २०२२) जिंकले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl destruction shoaib akhtar described mohammad sirajs deadly bowling in two words avw
First published on: 18-09-2023 at 00:01 IST